फिलिपिन्समध्ये राय चक्रीवादळामुळे भीषण हाहाकार माजला आहे. या भीषण चक्रीवादळ रायमुळे मृत्यूची संख्या आता २०८वर पोहोचली आहे. तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत. याबाबत नॅशनल पोलिसांनी सांगितले की, फिलिपिन्समध्ये यावर्षात सर्वात वेगाने आलेल्या राय चक्रीवादळामुळे मृत्यूची संख्या वाढून २०८ झाली आहे. टायफून रायने द्वीपसमूहाच्या दक्षिण आणि मध्य प्रदेशात कहर केल्यानंतर कमीत कमी २३९ जण जखमी झाले आहेत आणि ५२ जण बेपत्ता झाले आहेत. यावर्षात फिलिपिन्समध्ये आलेले हे चक्रीवादळ सर्वाधिक घातक असल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी फिलिपिन्समध्ये टायफून राय या चक्रीवादळामुळे शेकडो लोक बेघर झाले. हे चक्रीवादळ आल्यानंतर ३ लाखांहून अधिक लोकं आपल्या घरातून आणि समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्टमधून सुरक्षित स्थळी जाण्यासाठी मजूबर झाले. फिलिपिन्सच्या रेड क्रॉसच्या किनारी भागात खूप मोठे नुकसान झाले. रेड क्रॉसचे अध्यक्ष रिचर्ड गॉर्डन म्हणाले की, घरे, रुग्णालये, शाळा आणि सार्वजनिक गोष्टींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
स्थानिक राज्यपाल आर्थर याप यांनी आपल्या फेसबूक पेजवरून सांगितले की, राय चक्रीवादळाचा समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बोहोळ बेटाला मोठा फटका बसला आहे. चॉकलेट हिल्सच्या भागात ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. १९५ किलोमीटर प्रती तास वेगाने सुरू असलेल्या हवेमुळे सिरगाओ, दिनागट आणि मिंडानाओ बेटांवर विध्वंस झाला आहे.
या चक्रीवादळाची तुलना २०१३ मध्ये आलेल्या टायफून हैयानसोबत केली जात आहे. फिलिपिन्समध्ये आलेले हैयान चक्रीवादळ सर्वाधिक घातक चक्रीवादळ होते. ज्यामध्ये ७ हजार ३००हून अधिक जणांचा मृत्यू किंवा बेपत्ता झाले होते. सध्या राय चक्रीवादळामुळे दळणवळण, वीज पुरवठा ठप्प झाला आहे. मदत आणि बचाव कार्य अजून सुरू आहे. हजारो सैन्य, पोलीस, तटरक्षक दल आणि अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा – Omicron Variant: ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचा स्फोट; ७ जणांचा मृत्यू, एका दिवसात ९०, ४१८ बाधितांची नोंद