जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्रातील पाच आमदार दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून बचावले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यातून हे पाचही आमदार सुदैवाने वाचले आहेत. पंचायत राज समितीच्या कामासाठी १९ मे रोजी हे आमदार जम्मू काश्मिरला गेले होते. या हल्ल्यातून बचावलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आमदार सुधीर पारवे, राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, शिवेसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण, शिवेसेना आमदार तुकाराम काते यांचा समावेश आहे.
जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर असताना हे आमदार अनंतनाग जिल्ह्यातून प्रवास करत होते. बिज बिहारी दरम्यान त्यांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर ग्रेनेडचा हल्ला केला. मात्र आमदारांच्या गाडी चालकांनी आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी या सर्व आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेले. गाडीचालकाच्या आणि सैनिकांच्या प्रसंगावधानामुळे पाचही आमदार वाचले. या हल्ल्यात आमदारांच्या गाड्यांचे मोठं नुकसान झालं आहे. हल्ल्याची माहिती आमदारांनी विधिमंडळाला दिली आहे.