कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यांपासून देश लॉकडाऊन आहे. ज्याचा परिणाम सर्वात कमी उत्पन्न गटातील लोकांवर झाला आहे. या संकटात सरकारने थेट गरिबांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याची गरज आहे, असं नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा सांगितलं. याशिवाय ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या योजनेचं देखील कौतुक केलं आहे.
नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी आणि त्यांची पत्नी एस्थर डुफ्लो (Esther Duflo) रविवारी जयपूर साहित्य महोत्सवाच्या ऑनलाइन महोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी अभिजीत बॅनर्जी म्हणाले की कोरोना संकटाच्या वेळी सरकारने किमान १००० रुपये तातडीने प्रत्येक भारतीय नागरिकांच्या हातात दिले पाहिजेत. आणि पुढील काही महिने सतत हस्तांतरित करणं आवश्यक आहे. याशिवाय ते म्हणाले की, ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लवकरात लवकर राबवायला हवी.
‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ची प्रशंसा
एस्थर डुफ्लो म्हणाल्या की, सरकारने युनिव्हर्सल अल्ट्रा बेसिक इनकम (यूबीआय) त्वरित लागू करण्याची आवश्यकता आहे. जन धन योजना याचा एक प्रकार आहे. तथापि, दोन्ही अर्थशास्त्रज्ञांनी ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या योजनेचं कौतुक केलं. पण सरकारने तातडीने अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं ते म्हणाले. अभिजीत बॅनर्जी म्हणाले की लस तयार होईपर्यंत संकट कायम राहील. या महिन्याच्या सुरुवातीला अभिजीत बॅनर्जी म्हणाले होते की कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था १९९१ च्या तुलनेत मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला आहे. ते म्हणतात की सरकारने गरिबांच्या हाती पैसे पाठविण्याचा विचार केला पाहिजे.
हेही वाचा – नेपाळ: कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५० वर, ४ मृत्यू; पंतप्रधान ओलींनी भारताला ठरवलं दोषी
सामान विकत घेण्याची क्षमता नाही
यापूर्वी अभिजीत बॅनर्जी यांनीही कॉंग्रेस नेते राहुल गांधींशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितलं होतं की, जीवनावश्यक वस्तूंची मागणी आहे कारण पैसे नसल्याने कोणाला काहीच खरेदी करता येत नाही आहे. अशा परिस्थितीत लोकांना आर्थिक मदत करण्यात होणारा उशीर निरुपयोगी आहे. लॉकडाऊनमुळे, व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे आणि म्हणूनच आर्थिक मदतीची अधिक आवश्यकता आहे.