चिंताजनक! देशात हृदयविकाराचे वाढते प्रमाण; आयसीएमआरचा अहवाल

नवी दिल्ली : देशात हृदयविकार ही गंभीर समस्या बनत चालली आहे. आता आयसीएमआरच्या (ICMR) अहवालात याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. देशातील एकूण मृत्यूंपैकी 28 टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात, असे या अहवालात म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती दिली. कर्करोग आणि मधुमेहामुळे मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचेही या अहवालात नमूद आहे.

आयसीएमआरने ‘India : Health of the Nation’s States’ या नावाने अहवाल जारी केला आहे. सन 2016मध्ये देशात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 28.1 टक्के मृत्यू हृदयविकारामुळे झाले आहेत. 1990मध्ये हा आकडा 15.2 टक्के होता. दुसरीकडे, कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण 8.3 टक्के आहे आणि 10.9 टक्के मृत्यू श्वसनविकारामुळे झाले आहेत. विशेष म्हणजे, 2.2 टक्के मृत्यू पचनाच्या आजारांमुळे आणि 2.1 टक्के मानसिक आजारांमुळे झाले आहेत. मधुमेह, रक्ताशी संबंधित आजारांमुळे 6.5 टक्के मृत्यू झाले असल्याचे या आयसीएमआरच्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा – …अन्यथा राज्याचे वाटोळे होईल, कॉपी आणि पेपर फुटीप्रकरणी अजित पवार संतापले

सन 1990 मध्ये संसर्गजन्य रोग, मातृत्वासंबंधी आजारपण, नवजात बाळांचे आजार आणि कुपोषणसंबंधित रोगांमुळे देशात 53.6 टक्के मृत्यू झाले. याशिवाय, 8.5 टक्के लोकांचा मृत्यू दुखापतीमुळे झाल्याचे या अहवालात नमूद आहे. 2016मध्ये संसर्गजन्य रोग, मातृत्वासंबंधी आजारपण, नवजात बाळांचे आजार आणि कुपोषण-संबंधित रोगांमुळे मृत्यूची संख्या 27.5 टक्क्यांवर आली आहे. तर दुखापतींमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 10.7 टक्के आणि इतर आजारांमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 61.8 टक्के आहे, असेही या अहवालात नमूद असल्याचे आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

हेही वाचा – …या आशेवर मी माझा युक्तिवाद संपवतो; कपिल सिब्बलांची पुन्हा कोर्टात भावनिक साद