अमरनाथ गुंफेजवळ शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या ढगफुटीत (cloudburst) आतापर्यंत १६ यात्रेकरुंचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. तर ४० जण अद्यापही बेपत्ता आहेत, अशी माहिती एनडीआरएफचे अधिकारी अतुल करवाल यांनी दिली. तसेच, रेस्क्यू ऑपरेशनसाठी ४ एनडीआरएफ (NDRF)ची टीम तैनात असून त्यांच्याासोबत १०० बचावकार्तेही मदतीला आहेत. (Amarnath yatra cloudburst 16 died)
ढगफुटीमुळे अमरनाथ गुंफेजवळ यात्रेकरुंसाठी उभारण्यात आलेले तंबू आणि लंगर पाण्यात वाहून गेले आहेत. तर यात्रेकरुंना एअर लिफ्ट करून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमरनाथ येथेही पावसाचा जोर वाढल्याने यात्रा थांबवण्यात आली होती. यामुळे सगळे यात्रेकरु तंबू आणि छावण्यांमध्येच थांबले होते. मात्र संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली आणि मुसळधार पावसाच्या पाण्यात तंबूच वाहून गेले. तर काही ठिकाणी तंबूत पाणी शिरले. यामुळे भयभीत झालेले भाविक सैरावैरा धावू लागले. मात्र तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तसेच ITBP यांना संपर्क साधून पाचारण केले. त्यानंतर यात्रेकरूंना एअर लिफ्ट करुन सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
16 confirmed deaths, about 40 still seem to be missing. No landslide, but rain continues, though no problem in rescue work. 4 NDRF teams with over 100 rescuers in rescue work. Besides, Indian Army, SDRF, CRPF & others continue to rescue: NDRF DG Atul Karwal#AmarnathCloudburst pic.twitter.com/D23oKK9EA8
— ANI (@ANI) July 9, 2022
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. तर, या भागात दरड कोसळली नसल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, पाऊस सुरू असला तरीही बचावकार्यात कोणतेही अडथळे आलेले नाहीत, अशीही माहिती देण्यात आली आहे. सध्या एनडीआरएफचे चार पथकं तैनात असून १०० बचावकर्तेही मदत करत आहेत. तसेच, भारतीय जवान, एसडीआरएफ, सीपीआरएफ यांच्याकडून बचावकार्य सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाचा धोका कमी झाल्याने ३० जूनपासून पुन्हा यात्रा सुरू करण्यात आली. यामुळे यावर्षी तीन लाख भाविक या यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे. ४३ दिवस चालणारी ही यात्रा ११ ऑगस्टला संपणार आहे.
३० जूनला यात्रेकरुंची पहिली तुकडी निघाली असून यात आतापर्यंत ६५,००० हून अधिक भाविक सहभागी झाले आहेत. मात्र हवामान खराब झाल्याने मध्ये २ ते ३ दिवस यात्रा थांबवण्यात आली होती.