पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील सततच्या टीकेवरून माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी गुरूवारी काँग्रेसला घरचा अहेर दिला होता. त्यानंतर पक्षाचे आणखी एक ज्येष्ठ नेते ऍड. अभिषेक मनु सिंघवी यांनी आज, शुक्रवारी ट्वीट करत जयराम रमेश यांचे समर्थन केले आहे. राजकीय विश्लेषक कपील सतीश कोमीरेड्डी यांच्या ‘मालेवॉलेंट रिपब्लिक: अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा गुरुवारी दिल्लीमध्ये पार पडला.
या प्रकाशन समारंभात जयराम रमेश म्हणाले की, “मोदी लोकांशी अशा पद्धतीने संवाद साधतात की जास्तीत जास्त लोक त्यांच्याशी थेट जोडले जातात. मोदींच्या कामांचे जनतेकडून कौतुक होत आहे. अनेक कामे मोदींनीच पहिल्यांदा करुन दाखवली आहेत हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत काँग्रेस त्यांचा समाना करु शकत नाही,” असे मत रमेश यांनी व्यक्त केले. मोदींना कायम खलनायक म्हणून दाखवल्याने फायदा होणार नाही असा इशाराही रमेश यांनी स्वत:च्या पक्षाला दिला.
हेही वाचा – सावरकरांचा अवमान करणाऱ्या लोकांना भरचौकात फटकावले पाहीजे – उद्धव ठाकरे
‘जर तुम्ही कायमच मोदींना खलनायक असल्याचं म्हणत असाल तर तुम्ही त्यांचा समाना करु शकत नाही हे लक्षात घ्यायला हवं,’ असं मत रमेश यांनी व्यक्त केलं आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्रालयाबरोबरच पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या रमेश यांनी मोदींची स्तुती करण्यासाठी आपण हे मत व्यक्त करत नसल्याचे स्पष्ट केले.
राजकारणातील लोकांनी कमीत कमी मोदींनी प्रशासन आणि अर्थिक स्तरावर केलेल्या बदलांचा स्वीकार करायला हवा अशी इच्छा व्यक्त केली. राजकीय टीका करताना आम्ही मोदींच्या एक दोन योजनांची मस्करी केली. मात्र सर्वच निवडणूक प्रचारामध्ये त्यांच्या उज्वला योजनेमुळेच ते थेट करोडो महिलांशी जोडले गेल्याचे दिसून आले. यामुळे २०१४ साली त्यांच्याकडे असणाऱ्या राजकीय पाठिंब्यापेक्षा अधिक पाठिंबा मिळाला.
आम्ही आमच्या निवडणूक प्रचारामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. लोकांना तो पटलाही. त्यांनाही शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली मात्र त्यासाठी त्यांनी मोदींना दोषी धरले नाही. त्याचा परिणाम निकालांमध्ये दिसून आला. त्यामुळेच मोदी सामान्यांना इतके आपलेसे का वाटतात याचा आपण विचार करायला हवा, असं मत रमेश यांनी व्यक्त केले.
सिंघवींचे रमेश यांनी समर्थन
आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी चिदंबरम यांचे वकील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी जयराम रमेश यांचे समर्थन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वारंवार खलनायक म्हणून सादर करणे चुकीचे आहे. तसेच वारंवार टीक करुन विरोधी पक्ष एकाप्रकारे त्यांची मदत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Always said demonising #Modi wrong. No only is he #PM of nation, a one way opposition actually helps him. Acts are always good, bad & indifferent—they must be judged issue wise and nt person wise. Certainly, #ujjawala scheme is only one amongst other good deeds. #Jairamramesh
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) August 23, 2019
सिंघवी यांनी जयराम रमेश यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत ट्विट करत म्हटलं आहे की, “नरेंद्र मोदींनी खलनायक म्हणून सादर करणं चुकीचं असल्याचं मी नेहमची म्हटलं आहे. फक्त ते देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून नाही, तर असं केल्याने विरोधी पक्ष त्यांची मदत करत आहे”. “एखादं कृत्य हे चांगलं, वाईट किंवा वेगळं असतं. पण कामाचं मूल्यांकन हे मुद्द्यांवर संबंधित व्यक्तीच्या नाही तर मुद्द्यांच्या आधारावर झालं पाहिजे. ज्याप्रमाणे उज्ज्वला योजना चांगल्या कामांपैकी एक आहे”. यावेळी त्यांनी जयराम रमेश यांना टॅगदेखील केलं आहे.