नवी दिल्ली : अशोक गेहलोत गटातील बहुतांश आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यात आता काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी पक्षाचे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना महत्त्वाचे दिले आहेत. राजस्थानच्या आमदारांशी वन टू वन चर्चा करून समस्येवर तोडगा काढण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिले आहे. यानंतर दोन्ही निरीक्षक ज्यांनी सभापतींकडे राजीनामा सुपूर्द केला अशा सुमारे 90 आमदारांची भेट घेणार आहेत.
दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक ए माकन यांनी सोमवारी सांगितले की, ‘काँग्रेसचे आमदार प्रताप खाचरियावास, एस धारीवाल आणि सीपी जोशी यांनी आमची भेट घेऊन तीन मागण्या केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे 19 ऑक्टोबरनंतर राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर सोपवणे.
यावर ते पुढे म्हणाले की, मी आणि मल्लिकार्जुन खरगे या बैठकीसाठी AICC निरीक्षक म्हणून आलो होतो. जे आले नाहीत त्यांच्याशी बोलण्यासाठी आम्ही एक एक करून चर्चा करणार आहोत, असे आमदारांना सातत्याने सांगत होतो. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. काहीही असेल तुम्ही आम्हाला सांगा. कोणताही निर्णय घेतला जात नाही. तुमचे काहीही म्हणणे असेत ते सांगा आम्ही ते दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षांना सांगू.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदासाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार असून त्यांची निवड ही जवळपास निश्चित आहे. असे असतानाही असंतुष्ट गटातील नेते शशी थरूर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेस अध्यक्षपदाची शेवटची निवडणूक 2000 साली झाली होती. त्यानंतर जितेंद्र प्रसाद सोनिया गांधींच्या विरोधात मैदानात उतरले होते आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सोनिया गांधी तीनवेळा अध्यक्षपदी तर राहुल गांधी एकदा बिनविरोध निवडून आल्या. अशाप्रकारे दोन दशकांनंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. 1997 मध्ये शरद पवार आणि राजेश पायलट सीताराम केसरी यांच्या विरोधात रिंगणात उतरले होते, मात्र दोघांचाही केसरीकडून पराभव झाला होता.