आपल्या वक्तव्याने नेहमी वादात असलेले काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. आपल्या देशात मुस्लीमांपेक्षा गाई जास्त सुरक्षित असल्याचे शशी थरूर यांनी म्हटले आहे. भाजपचे नेते जातीय दंगे कमी झाल्याचा दावा करतात. कारण या देशात त्यांना मुस्लीमांपेक्षा गाई जास्त सुरक्षित वाटतात असे ट्विट शशी थरूर यांनी केले आहे. यापूर्वी देखील शशी थरूर यांनी हिंदु-पाकिस्तान असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला होता. जुना वाद शमतो न शमतो तोच आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये गाईंची तस्करी करत असल्याच्या संशयातून अकबर खान याची जमावाकडून हत्या करण्यात आली. त्यानंतर ट्विट करत शशी थरूर यांनी देशामध्ये मुस्लिमांपेक्षा गाई जास्त सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, बेताल वक्तव्य करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे शशी शरूर यांच्यावर आता राहुल गांधी काय कारवाई करणार? असा प्रश्न आता विचारला जात आहेत.
Why BJP Ministers’ claims about reduction in communal violence don’t stand up to the facts: It seems safer in many places to be a cow than a Muslim. https://t.co/ZACOJ005rs
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) 22 July 2018
शशी थरूर यांची वादग्रस्त वक्तव्य
२०१९च्या निवडणुका जिंकल्यास भारत ‘हिंदु पाकिस्तान’ होईल अशी जहरी टीका शशी थरूर यांनी भाजपवर केली होती. शिवाय, भारतीय जनता पार्टी लोकसभा २०१९च्या निवडणुका जिंकल्यास नवीन संविधान लिहिले जाईल. ज्यामुळे देश पाकिस्तान बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल. त्यावेळी अल्पसंख्याकांना कोणताही सन्मान नसेल. २०१९च्या लोकसभा भाजपने जिंकल्यास लोकशाहीला धोका आहे. तयार होणारे नवीन राष्ट्र हे हिंदु सिद्धांतावर असेल. परिणामी अल्पसंख्यांकांमधील समानता नष्ट होईल. हेच दिवस पाहण्यासाठी पंडित नेहरू, महात्मा गांधी, मौलाना आझादांसह इतर महान नेत्यांनी संघर्ष केला होता का? असा सवाल देखील शशी थरूर यांनी केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.
तर तिरूअनंतपूरम येथील कार्यक्रमात बोलताना शशी थरूर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाला तालिबानच्या मार्गावर नेत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता
काय म्हणाले राहुल गांधी
मी एक लढाई लढत आहे. पक्षाच्या वतीने बोलण्याची, पक्षाची विचारधारा मांडण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. पण. जर कुणी बेताल वक्तव्य करत असेल तर त्याची हयगय केली जाणार नाही. त्या नेत्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे राहुल गांधी आता काँग्रेसचे ज्येष्ठ आणि जुने नेते शशी थरूर यांच्यावर काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.