घरदेश-विदेशदहा वर्षे सत्ता भोगूनही..., घराणेशाहीवरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

दहा वर्षे सत्ता भोगूनही…, घराणेशाहीवरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : आज घराणेशाही व चाटूगिरीने आपला देश बरबाद केला आहे. एखाद्या राजकीय पक्षाची सूत्रे फक्त एकाच परिवाराकडे कशी काय असू शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना केला. मोदी यांनी त्यांच्या स्वभावानुसार हा हल्ला काँग्रेस व गांधी कुटुंबावर केला. दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी हे काँग्रेस व गांधी परिवाराच्या गुंत्यात अडकून पडले आहेत. त्यांच्या मनातून गांधी व काँग्रेस जात नाही व लाल किल्ल्याच्या इतिहासावर नेहरूंचा असलेला ठसा त्यांना स्वस्थता लाभू देत नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष आज गांधी कुटुंबाबाहेरचे आहेत. सोनिया गांधी यांनी राजकारणातून जवळ जवळ निवृत्ती पत्करली आहे. राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे की, आपल्याला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. संपूर्ण देश हाच माझा परिवार आहे. “मैं आपको भारत माता की रक्षा करते हुए मिलुंगा, जहा भी भारत मातापर आक्रमण होगा, मैं वहा आपको खडा मिलुंगा’’ असे राहुल गांधी सांगत आहेत व यात घराणेशाही कोठे आहे? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लोकांना पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर टीकास्त्र

महत्त्वाच्या पदावर गुजरातमधील माणसे
प्रियांका गांधी या देशभरात दौरे करून लोकांना हुकूमशाहीविरोधात जागे करीत आहेत. घराणेशाहीचा शिरकाव हा भारतीय जनता पक्षात झाला आहे व ही घराणेशाही भाजपाने काँग्रेसकडूनच घेतली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर चिरंजीव खासदार, नारायण राणे केंद्रीय मंत्री तर चिरंजीव खाली आमदार. देशभरात प्रत्येक महत्त्वाच्या पदावर आज गुजरातमधूनच माणसे भरली जातात. हीसुद्धा एक प्रकारची घराणेशाहीच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

इतर पंतप्रधानांचे राजकीय कर्तृत्व सरस
पंतप्रधान येतात आणि जातात, पण मोदी यांना मिळालेला दहा वर्षांचा काळ हा निंदानालस्ती, विरोधकांना त्रास देण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधणे व अमलात आणणे यातच गेला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी, नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी हे आपला ठसा उमटवून गेले. अनेक नेत्यांना मोदी यांच्या तुलनेत कमी कालखंड मिळाला, पण या सर्व नेत्यांचे राजकीय कर्तृत्व सरस होते. मोदी यांना साधारण दहा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड मिळाला, पण त्यांच्या हातून कोणतेही महान कार्य खरेच घडले काय ते शोधावे लागेल. राजकीय विरोधकांच्या टिंगलटवाळ्या करण्यातच त्यांनी वेळ घालवला, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – …आणि मी आजपर्यंत थांबलो, भरत गोगवले यांनी मांडली कळ आतल्या जिवाची!

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्री एकाच राज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान व भाजपा अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते. सर्व सूत्रे व अंमलबजावणीचे अधिकार आपल्याच हाती असावेत याच ‘उदात्त’ हेतूने हे सर्व सुरू आहे. हे घराणेशाहीचेच रूप असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

मणिपूरवर नाइलाजाने बोलले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या हिंसाचाराचा उल्लेख लाल किल्ल्यावरील भाषणात केला. मणिपुरात लवकरच शांतता प्रस्थापित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, पण मणिपूरच्या प्रश्नावर संसदेत विरोधक प्रश्न विचारत होते, तेव्हा मणिपूरवर भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत फिरकले नाहीत. मोदींना मणिपूरवर बोलते करण्यासाठी संसदेत अविश्वास ठराव मांडावा लागला. मोदी मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर नाइलाज म्हणून लाल किल्ल्यावरून बोलले. ते बोलले नसते तर पुन्हा त्यांच्यावर हल्ले झाले असते, असे स्पष्ट मत ठाकरे गटाने मांडले आहे.

2024चा तिरंगा मोदी फडकवणार नाहीत
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सांगितले की, “लाल किल्ल्यावरून मोदींचे हे शेवटचे भाषण आहे.’’ लालू यादव जे बोलले ते खरे ठरो, लालू यादवांच्या तोंडात साखर पडो अशा प्रकारच्या भावना देशाच्या गावागावांत आहेत. लाल किल्ल्यावर 2024चा तिरंगा मोदी फडकवणार नाहीत, असे एकंदरीत वातावरण आहे. लालू यादव यांनी त्यांचे मत स्पष्टपणे मांडल्यामुळे त्यांच्या घरावर ‘ईडी’चे छापे नव्याने पडू शकतील व एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकवून यादव कुटुंबाचा छळ केला जाईल. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या देशात यापेक्षा वेगळे काहीच घडत नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादी अजित पवारांना दिली जाईल; संजय राऊतांनी व्यक्त केली भीती

लालू यादवांची भविष्यवाणी…
देशातील न्याययंत्रणा, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, राष्ट्रपती वगैरे घटनात्मक संस्था आज दहशतीच्या टाचेखाली आहेत. घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते. आज लाल किल्लाही भयग्रस्त व अस्वस्थ असेल. त्यामुळे ‘लाल किल्ल्यावरून मोदी यांचे हे शेवटचे भाषण आहे’ ही लालू यादवांची भविष्यवाणी ही 140 कोटी लोकांची, स्वातंत्र्य संग्रामातील शहीद आत्म्यांची शापवाणी ठरू शकेल, असा आशावाद ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -