देशातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आगामी 5राज्यांतील निवडणुकांबाबत चर्चा सुरु आहेत. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे या निवडणुका होणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगामध्ये अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या आहेत. यामध्ये निवडणूक घेण्यात येणाऱ्या राज्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. आयोगाकडून त्या राज्यांमध्ये सर्वेक्षणही कऱण्यात आले आहे. त्यामुळे आता येत्या दोन दिवसांमध्येच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका 8 टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होऊ शकतात.
देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमधील राजकीय पक्षांकडून जोरात तयारी सुरु आहे. मणिपूर, उत्तराखंड,गोवा, उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये टीकेचे बाण सुरु आहेत. तसेच कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे निवडणुका घ्यायच्या की नाही याबाबत निवडणूक आयोग चिंतन करत आहे.
मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात दोन निवडणुका होऊ शकतात. गुरुवारी आरोग्य मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये पाच राज्यांमधील कोरोना परिस्थितीची माहिती घेण्यात आली आहे. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून आता निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली एकूण 8 टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या होत्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोग पुन्हा युपीमध्ये 8 टप्प्यात निवडणुका घेण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बूथ बनवण्यात येत आहेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर कोरोनापासून संरक्षणासाठी यंत्रणा बसवण्यात जोर दिला जात आहे.
मणिपुर निवडणुकीसाठी आयोगाची तयारी
मणिपुरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने खास तयारी केली आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने मणिपूरमधील कोरोना परिस्थितीचा व्हिसीद्वारे आढावा घेतला आहे. या बैठकीमध्ये निष्पक्ष आणि सुरक्षित निवडणुका कशाप्रकारे होतील यावर भर दिला जात आहे. तसेच राज्यातील जिल्हाधिकारी, एसपी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा : पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींचा ताफा अडवला