देशभारात गेल्या १० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज मध्यप्रदेशच्या मंदसौरमध्ये सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या या सभेला राजकीय वर्तुळात महत्व आहे. राहुल गांधींच्या या सभेत सहभागी न होण्याबद्दल लोकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.
काँग्रेसची ‘किसान समृध्दी संकल्प रॅली’
मंदसौरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉलेजमध्ये राहुल गांधी या रॅलीला संबोधित करणार आहेत. गेल्यावर्षी याच दिवशी मंदसौरमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज या सभेमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहेत. काँग्रेसने या रॅलीचं नाव ‘किसान समृध्दी संकल्प रॅली’ असं ठेवलं आहे. या रॅलीमध्ये गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल सहभागी होण्याची शक्यता आहे. १ जूनपासून शेतकऱ्यांचे १० दिवसांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.
MP: Parents of Abhishek Patidar, who died during #Mandsaur farmers' protest last year,say, 'SDM (Sub-Divisional Magistrate) called our other son & asked who among us will meet Rahul Gandhi, when my son told him that my parents are going,SDM said ask them to not meet Rahul Gandhi' pic.twitter.com/aVE9UgfAaq
— ANI (@ANI) June 6, 2018
प्रशासनाकडून टाकला जातोय दबाव
शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना राहुल गांधींची भेट घेण्यापासून प्रशासनाकडून दबाव टाकला जात आहे. मागच्या वर्षी आंदोलनादरम्यान गोळीबारात मृत्यू झालेल्या अभिषेक पाटीदारच्या आई-वडिलांनी हा आरोप केलाय. ‘राहुल गांधी यांना भेटू नका’ अशी धमकी प्रशासनाने दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राहुल गांधी यांचं मंदसौर येथे आगमन होण्यापूर्वीच ही धमकी देण्यात आली आहे.
राहुल गांधींना भेटले तर नोकरी जाईल!
अभिषेकच्या मृत्यूनंतर सरकारने त्याचा भाऊ संदीप पाटीदारला नागपूर येथे सरकारी खात्यात चतुर्थ श्रेणीमध्ये नोकरी दिली होती. त्याला फोन करुन एडीएम आर. के. वर्मा यांनी धमकी दिली. “तू सरकारी नोकरीमध्ये आहेस. जर तुझे आई-वडील राहुल गांधींना भेटायला गेले, तर तुझी नोकरी जाऊ शकते,” असं वर्मा यांनी सांगितलं. याआधी अभिषेकचे काका मधुसूदन पाटीदार यांच्यावर देखील मंदसौर प्रशासनाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान एडीएम वर्मा यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. ‘आपण फक्त सभेसाठी कोण जाणार आहे याची माहिती घेत होतो’, असा दावा त्यांनी केला.
काय झाले होते गेल्या वर्षीच्या आंदोलनात?
मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं १ जून ते १० जूनपर्यंत आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचं मुख्य केंद्र मंदसौर होतं. ६ जूनला मंदसौरच्या पिपलिया येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.