बिहारच्या मुजफ्फर येथील शेल्टर होममध्ये ३४ मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने बिहारचे राजकारण तापले आहे. या घटनेनंतर डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी गुरुवारी बिहार बंदची हाक दिली आहे. या बंदला राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आणि कॉंग्रेसने समर्थन दिले आहे. या घटनेमुळे डाव्या पक्षाचे नेते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, या बंदमुळे पाटण्याच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बिहारच्या काही भागांमध्ये रेलरोको आंदोलन केले गेले.
पोलीस अधिकाऱ्यांशी आंदोलकांची बाचाबाची
विरोधी पक्षाने महिला सुरक्षेच्या मुद्यावर बिहारच्या राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन पेटले आहे. पाटणामध्ये या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आहे. तर, कुठे पोलीस आणि आंदोलक यांच्यात हाणामारी झाली आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे पाटण्यामधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पाटणामध्ये रिक्षा देखील बंद आहेत. त्याचबरोबर जहानाबाद, मधुबनी आणि दरभंगामध्ये रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
‘या’ शहरांमध्ये बंदची सर्वात जास्त झळ
डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी रेल्वे रुळावर आंदोलन केले. त्यामुळे गुरुवारी सकाळी रेल्वे वाहतुकीला या आंदोलनाचा फटका बसला. या आंदोलकांनी दरभंगा, मधुबनी, जहानाबाद, गया, मुजफ्फरपूर, पाटणा आणि भोजपूर जिल्ह्यांमध्ये रोल्वे रोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी सिवान, भोजपूर, नवादा, पाटणा, अरवाल, जगबाद जिल्ह्यांतील काही भागांमध्ये रस्तेही बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.
सोशल मीडियावर नितीश कुमार लक्ष्य
या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी धारण केलेल्या मौनावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. आरजेडी नेता तेजस्वी कुमार यांनीही सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री नीतीश कुमार जी से मुज़फ़्फ़रपुर बलात्कार कांड पर मुँह खुलवा कर रहूँगा।
उनकी आपराधिक चुप्पी तुड़वा कर रहूँगा।
उनकी कुंभकर्णी अंतरात्मा को जगा कर रहूँगा।
उनकी फर्ज़ी नैतिकता उजागर करके रहूँगा।
उनका बनावटी मुखौटा उतार कर रहूँगा।
चाहे जो समय लगे।
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) August 2, 2018
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
मुजफ्फरपूरच्या घटनेविषयी सीबीआयने चौकशी सुरु केली आहे. हा संवेदनशील विषय आता संसदेत धडकला आहे. दरम्यान, बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहीत या घटनेविषयी चिंता व्यक्त केली आहे.