कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. १४ एप्रिल रोजी या लॉकडाऊनचा कालावधी संपत आहे. पण सद्यस्थिती पाहता लॉकडाऊनचा हा कालावधी वाढवण्यात यावा अशी विनंती सर्वच राज्यांनी केंद्र सरकारला केली आहे. तसेच या वाढीव लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयही जूनपर्यंत बंद ठेवण्यात यावी असे अपील देशातील सगळ्याच राज्यांनी केंद्राकडे केले आहे.
केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली असून यावर तज्ज्ञांचे मत मागवले आहे. त्यातही केंद्र सरकार धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याबरोबरच हॉटेल्स, रेस्टॉरंट शाळा- महाविद्यालये जूनपर्यंत बंद ठेवण्याचा विचार करत आहे. यादरम्यान शासकिय अधिकाऱ्यांच्या बदल्याही सहा महिने पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे मत जाणून घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधला होता. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील विशेष समितीकडे अनेक राज्यांनी आपल्या प्रतिक्रिया पत्राद्वारे पाठवल्या आहेत. यात सर्वच राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची विनंती केली आहे.
तसेच लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत लग्नसमारंभ, कंपन्यांच्या बैठकांवरही बंदी घालण्यात येणार आहे. अशी माहिती एका वृत्तसंकेतस्थळाने दिली आहे.