पंतप्रधान नरेंद्र मोदी यां पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. कोरोना या एका विषाणुमुळे जगभरात कहर सुरू आहे. या आधी एवढं मोठं संकट बघितलं नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं म्हणत, या संकटातून वाचण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन ४ ची घोषणा केली. मात्र १८ मे च्या आधी लॉकडाऊन ४ च्या नियमांची माहिती देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करताना हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याची माहिती दिली.
२० लाख कोटींच्या पॅकेजची मोदींकडून घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे लोकल उद्याजकांना चालना देण्यासाठी लोकल प्रोडक्ट खरेदी करा असे आवाहनही मोदींनी लोकांना केलं.
‘आत्मनिर्भर भारत’
यावेळी मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेची घोषणा केली. ‘आत्मनिर्भर भारत’ हेच आपलं उद्दीष्ट आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे आत्मकेंद्री व्यवस्था नव्हे. ‘आत्मनिर्भर भारत’ म्हणजे संपूर्ण विश्वाची चिंता. या जीवन मृत्यूच्या लढाईत भारताकडून जगाला खूप आशा आहेत. जगातलं उत्तम टॅलेंट भारताकडे आहे. विश्वाच्या कल्याणासाठी भारत चांगलं काम करू शकतो. आपण भारतात सर्वोत्तम काही बनवू शकतो. यासाठी गरजपडेल ते सगळं करण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे आपण ठरवलं तर भारतात काही करणं अशक्य नाही. अर्थव्यवस्था, पायाभूत विकास, यंत्रणा, आणि मागणी हे महत्त्वाचे स्तंभ आहेत. गेल्या शतकापासून २१ वं शतक भारताचं असल्याचं ऐकत आहोत. करोना संकटानंतरही जगात जी स्थिती निर्माण होत आहे ती आपण पाहत आहोत. २१ वं शतक भारताचं व्हावं हे आपलं स्वप्न नाही तर जबाबदारीही आहे. जगाची आजची स्थिती पाहता त्यासाठी आत्मनिर्भर भारत हाच एकमेव मार्ग आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.