अहमदनगर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांनी नक्षलवादी आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली आहे. काही नक्षलवादी हे आंबेडकरवादाचा बुरखा घालून कांगावा करतात. आंबेडकरवादी असल्याचा कांगावा करुन हिंसक कारवायात सामील होऊ नये, असे वक्तव्य आठवले यांनी केले. आरपीआय पक्षाच्या मेळाव्यानिमित्त रामदास आठवले अहमदनगर येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
आठवले पुढे म्हणाले की, जे विचारवंत आहेत त्यांना अटक करता कामा नये. पण हिंसक कारवायामध्ये सहभागी असणार्यांना आणि नक्षलवाद्यांना अटक झाली पाहीजे. दलित पँथरच्या काळात आम्ही नक्षलवाद्यांपेक्षाही अधिक आक्रमक होतो. मात्र समाजविघातक कृत्य कधीच केले नाही. समाज जोडण्याचेच काम आम्ही केले होते. मात्र काही नक्षलवादी हे आंबेडकरवादाचा बुरखा घालून नक्षवलादी कारवाया करतात, असा आरोप आठवले यांनी केला. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा नक्षलवादाशी काहीही संबंध नसून ते आंबेडकरवादी आहेत, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींवर टीका
सर्व विरोधक एकजुट होऊनही बंदला प्रतिसाद मिळाला नाही. राहुल गांधी फक्त आरोपच करतात, मात्र त्याचा काहीच परिणाम होणार नाही. २०१९ ला देखील मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येईल, असा दावा आठवले यांनी केला आहे.