हुबळी : पुढची 25 वर्षे राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. युवा शक्तीची स्वप्ने आणि आकांक्षा भारताची भविष्यातली दिशा आणि उद्दिष्ट ठरविणार आहेत, आणि युवाशक्तीचा उत्साह देशाचा मार्ग ठरवणार आहे. या युवाशक्तीचा वापर करून घेण्यासाठी आपण विचारांनी आणि आपल्या प्रयत्नांनी तरुण असायला पाहिजे. तरुण असणे म्हणजे अभिनव प्रयत्न करत राहणे. तरुण असणे म्हणजे व्यावहारिक भान असणे. आज जग आपल्याकडे समस्यांवरील उपायांच्या अपेक्षेने बघत असेल, तर त्याचे कारण आहे आपल्या ‘अमृत’ पिढीचे समर्पण, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकातील हुबळीमध्ये 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. स्वामी विवेकानंदाची जयंती म्हणून त्यांचे आदर्श, त्यांची शिकवण आणि देश उभारणीत त्यांचे योगदान याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 जानेवारी हा दिवस देशभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आयोजित संमेलनाची संकल्पना, ‘विकसित युवा-विकसित भारत’ अशी असून, देशाच्या सर्व भागातील विविधांगी संस्कृती एका मंचावर आणून ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे तत्व अधिक बळकट करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.
A special time in our history and a special generation of youngsters…no wonder the future belongs to India! pic.twitter.com/9K6qca1aFm
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2023
एकवीसाव्या शतकातील हा काळ अतिशय महत्वाचा आहे, कारण आज भारत अफाट लोकसंख्या असलेला तरुण देश आहे. भारताच्या या प्रवासात युवा शक्ती महत्त्वाची ठरणार आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी, एकीकडे आपण राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करतो आहोत, तर दुसरीकडे, देशात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचाही उत्साह आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचाच संदेश उद्धृत करत, “उठा, जागृत व्हा आणि आपले लक्ष्य साध्य होईपर्यंत थांबू नका” असे आवाहन युवकांना केले.
आज भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि आमचे ध्येय आहे पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणे. कृषी आणि क्रीडा क्षेत्रात निर्माण होत असलेल्या संधींचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला आणि या क्रांतीचे श्रेय युवा शक्तीला दिले. तुमच्या टेक-ऑफसाठी धावपट्टी तयार आहे. आज जगभरात भारत आणि तरुणांप्रती मोठा आशावाद आहे. हा आशावाद तुमच्याबद्दल आहे. हा आशावाद तुमच्यामुळेच आहे आणि हा आशावाद तुमच्यासाठी आहे! आजचे शतक हे भारताचे शतक आहे असा आवाज जागतिक पातळीवर उठत आहे. हे तुमचे शतक आहे, भारताच्या तरुणांचे शतक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आज देशाचे ध्येय आहे – विकसित भारत, सशक्त भारत! विकसित भारताचे हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आपण थांबू शकत नाही देशातील प्रत्येक तरुण हे स्वप्न साकार करेल आणि देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, निसिथ प्रामाणिक आणि कर्नाटकातील इतर मंत्री उपस्थित होते.
कलाकारांना पंतप्रधानांकडून अभिवादन
कर्नाटकातील हुबळी हा भाग आपली विशिष्ट संस्कृती, परंपरा आणि ज्ञान यासाठी ओळखला जातो, इथल्या नामवंत लेखकांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. या प्रदेशाने देशाला, पंडित कुमार गंधर्व, पंडित बसवराज राजगुरू, पंडित मल्लिकार्जुन मंसूर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि गंगूबाई हंगल यांच्यासारखे महान गायक-संगीतकारही दिले आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी या सर्व कलाकारांना अभिवादन केले.