केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानला जाणारे पाणी लवकरच अडवले जाईल, याचे संकेत दिले आहेत. त्याकरताचे प्रयत्न सुरू असून त्यात यशदेखील मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहेत. तसेच हे पाणी राजस्थान, पंजाब आणि हरियाणाला मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी बुधवारी मध्य प्रदेशमधील व्हर्चुअल रॅलीला संबोधित करत असताना त्यांनी हा आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले की, अटल बिहारी वाजपायी पंतप्रधान असताना नदी जोडणीच्या योजनेला पाठिंबा दर्शवला होता. ज्यावर आता मोदी सरकार जलद गतीने काम करत आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी
मी जेव्हा पाणी संवर्धन मंत्री होतो, तेव्हा १९७० पासूनचे नऊ प्रोजेक्ट आतापर्यंत अडकून राहिल्याचे पाहिले आहे. पंजाब, उत्तर, प्रदेश, हरियाणा सारखे राज्य पाण्यासाठी एकमेकांशी भांडत आहेत. ज्याचा फायदा पाकिस्तानने घेतला. आम्ही नऊपैकी सात प्रोजेक्ट मार्गी लावली आहेत. भारत-पाकिस्तान फाळणीत तीन – तीन नद्यांचे समान वाटप दोन्ही देशांमध्ये झाले होते. मात्र भारतातील नद्यांचे पाणीदेखील पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. पंतप्रधानांनी हे प्रकरण सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती. मी जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तसेच सात प्रोजेक्ट सुरू करण्यात आम्हाला यश आले. यामुळे आपल्याला पाकिस्तानकडे वळणारे पाणी अडवण्यास यश येईल. ते पाणी काही राज्यांना मिळेल.