पाटणा : कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता उलथवून काँग्रेसने निर्विवाद बहुमत मिळविले आहे. भाजपाकडे कर्नाटक हे दक्षिणेकडील एकमेव राज्य होते. कर्नाटकातील काँग्रेसच्या या विजयाच्या अनुषंगाने पत्रकाराने प्रश्न विचारताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आणि म्हणाले, विरोधी पक्ष एकत्र आले तर ते राष्ट्रहिताचेच ठरेल आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
#WATCH | Darbhanga, Bihar: “They (Congress) had a massive win (in Karnataka). I am in contact with the CM designate, he and Congress President also invited me to the swearing-in ceremony, so I told them that I will come…if opposition parties come together that will be in the… pic.twitter.com/ucN9II6i5b
— ANI (@ANI) May 19, 2023
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 135 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. 224 सदस्यीय विधानसभेत सत्तास्थापनेसाठी 113 जागा जिंकणे आवश्यक असते. कर्नाटक विजयामुळे केवळ काँग्रेसच नव्हे तर, सर्वच विरोधकांना हुरूप आला आहे. काँग्रेसपासून चार हात लांब राहण्याचेच धोरण अवलंबणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सूरही मवाळ झाला आहे. जिथे काँग्रेस मजबूत असेल तिथे त्यांनी लढले पाहिजे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मात्र, काँग्रेसनेही इतर पक्षांनाही साथ द्यायला हवी, असे त्यांनी अलीकडेच म्हटले आहे.
दुसरीकडे जदयूचे नेते नितीश कुमार भाजपाविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरभंगा येथे एका कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने, तुम्ही सुरू केलेल्या मोहिमेचा परिणाम दिसत आहे… असे म्हणताच, नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले आणि म्हणाले, हेच तर प्रयत्न सुरू आहेत. सर्व विरोधक एकत्र आले तर, ते देशाच्या दृष्टीने हिताचे आहे.
सिद्धरामय्या शनिवारी (20 मे) कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अनेक नेत्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.