भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी आज देशभरात छापे टाकून पाच जणांची अटक केली. यानंतर ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाचे लेखक रामचंद्र गुहा यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र पोलिसांचे कृत्य हे क्रूर, दडपशाही वृत्तीचे, अनियंत्रित कारभार आणि बेकायदेशीर असल्याचे गुहा म्हणाले. यासंबंधी गुहा यांनी ट्विट केले असून महात्मा गांधी जर आज असते तर त्यांनाही मोदी सरकारने अटक केले असते, असे म्हटले आहे.
या संदर्भात एनडीटीव्ही वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुहा म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेले कार्यकर्ते हे आदिवासी समाजासाठी काम करत होते. त्यांच्या अटकेमुळे आता आदिवासी समाजाचे नेतृत्व हिरावून घेतले गेले आहे. हे सरकार भांडवलदारांसाठी असून त्यांना खनिज संपत्तीने मुबलस असलेली आदिवासींची जमिन बळकवायची आहे, असा आरोप गुहा यांनी केला.
आपल्या ट्विटमध्ये रामचंद्र गुहा म्हणाले की, “आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी आपला वकीलीचा कोर्ट चढवून सुधा भारद्वाजसाठी स्वतः खटला लढला असता आणि या आरोपाखाली मोदी सरकारने त्यांनाही अटक केली असती.”
As a biographer of Gandhi, I have no doubt that if the Mahatma was alive today, he would don his lawyer's robes and defend Sudha Bharadwaj in court; that is assuming the Modi Sarkar hadn't yet detained and arrested him too
— Ramachandra Guha (@Ram_Guha) August 28, 2018
आज दिवसभरात पुणे पोलिसांच्या पथकाने देशभरातील पाच शहरात छापे मारून वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अरुण परेरा, गौतम नवलखा आणि वर्नोन गोनसाल्वीस यांना अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार एल्गार परिषदेच्या पार्श्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आली आहे. याआधी जून महिन्यात सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन आणि शोमा सेन यांना अटक करण्यात आली होती. एल्गार परिषदेमध्ये नक्षलवाद्यांनी पैसा पुरवल्याचा आणि भडकाऊ भाषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
गुहा यांच्यासोबतच प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय आणि विचारवंत इंदिरा जयसिंग यांनी देखील या कारवाईवर तिखट शब्दात टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, “एक दिवस असा उजडेल, ज्या दिवशी कायद्याचे रक्षण करणारा एकही उरणार नाही आणि असाही एक दिवस येईल की कुणाचेही रक्षण करणारा एकही कायदा उरणार नाही.”