उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकी दरम्यान कर्तव्य बजावताना कोरोना संसर्ग झालेल्या तब्बल १६२१ शिक्षकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. यात शिक्षण मित्र, माध्यामिक शिक्षण विभागाचे शिक्षक आणि इतर शिक्षकांचा समावेश होता. उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाने उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकीदरम्यान मृत झालेल्या शिक्षकांची माहिती जाहीर केली आहे. यापूर्वी २८ एप्रिल रोजी शिक्षक संघाने जाहीर केलेल्या यादी कोरोना संक्रमणामुळे ७०६ शिक्षक आणि कर्मचार्यांचा मृत्यू झाला होता.
उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाच्या आठ मागण्या
दरम्यान शिक्षक संघाने १६ मे रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात उत्तर प्रदेश पंचायत निवडणुक ड्युटी बजावताना मृत्यू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत जाहीर करत त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकार नोकरी देण्यासह आठ मागण्या केल्या आहेत. प्राथमिक शिक्षक संघटनेने पाठवलेल्या पत्रात नमुद करण्यात आले की, उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यातील १६२१ शिक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी, आणि शिक्षक मित्रांचा कोरोना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला आहे. हे सर्व शिक्षण आणि कर्मचारी पंचायत निवडणुकीत कर्तव्य बजावले होते. या पत्रात प्राथमिक शिक्षक संघटनेने कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या शिक्षकांची नावे, त्यांच्या शाळेची नावे, पदनाम, गट व जिल्ह्याचे नाव, मृत्यूची तारीख आणि मृत शिक्षकाच्या कुटूंबाचा मोबाइल क्रमांकही देण्यात आला आहे. .
आजमगडमध्ये सर्वाधिक मृत्यू
दरम्यान उत्तरप्रदेशाच्या आजमगड जिल्ह्यात सर्वाधिक ६८ शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गोरखपूरमध्ये ५०, लखीमपूरमध्ये ४७, रायबरेलीमध्ये, ५३, जौनपुरमध्ये ४३ इलाहाबादमध्ये, ४६, लखनऊमध्ये ३५, सीतापूरमध्ये ३९, उन्नावमध्ये ३४, गाझीपूरमध्ये ३६ तर बाराबंकी येथे ३४ शिक्षकोत्तर कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशातील २३ जिल्ह्यांमध्ये २५ पेक्षा अधिक शिक्षक व व कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
या उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. दिनेशचंद्र शर्मा यांच्या मते, या शिक्षक व कर्मचार्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान भरपाई देण्यासंदर्भात उच्च न्यायालयानेही सहमती दर्शविली आहे. ज्या कुटुंबात डीएलईड किंवा बीएडची पात्रता असेल अशांना टीईटीमधून सूट देऊन तत्काळ शिक्षकपदावर नियुक्ती करावी. त्याचबरोबर उर्वरितांची क्लार्क पदावर नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.