टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल वेटलिफ्टर मीराबाई चानूचे देशात जोरदार स्वागत करण्यात आले. यासह रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचा सोमवारी सत्कार केला आणि २ कोटी रूपयांचे बक्षीस आणि ईशान्य रेल्वेमध्ये पदोन्नती जाहीर केली. मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मीराबाई चानूचे अभिनंदन करताना त्यांनी मीराबाई चानूला २ कोटींच्या बक्षीसासह प्रमोशन देण्याचीही घोषणा केली. मीराबाई चानू ही स्पोर्ट्स कोट्यातील रेल्वेची कर्मचारी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. आगामी काळात भारतीय खेळाडू आणखी पदक जिंकतील, असं मीराबाई चानूचे प्रशिक्षक यावेळी म्हणाले.
It was great to meet and congratulate the pride of India and honour of Indian Rly, @mirabai_chanu. Also felicitated her & announced Rs. 2 Cr , a promotion and more. She has inspired billions around the world with her talent, handwork and grit.
Keep winning for India! pic.twitter.com/gYRftarOrr— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) July 26, 2021
देशभरातून कौतुकाचा वर्षाव
मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली. तिने एकूण २०२ किलोचे (८७+११५) वजन उचलत ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडले. तिच्या या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. यासह मीराबाईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकताच मणिपूरमध्ये तिचे कुटुंब आणि शेजारी राहणाऱ्या सर्वांनी जल्लोष केला. हे सर्व जण सकाळी उठून मीराबाईचा खेळ टीव्हीवर पाहत होते. ‘आम्हाला खूप आनंद झाला आहे. मीराने खूप मेहनत घेतली असून त्याचे तिला फळ मिळाले आहे. भारत आणि मणिपूरला तिचा अभिमान आहे,’ असे मीराबाईच्या नातेवाईकांनी सांगितले. मीराबाईच्या कामगिरीचे क्रीडा, मनोरंजन आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रातून कौतुक झाले.
भारताला वेटलिफ्टिंगमधील पहिले पदक
शनिवारी झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो, तर क्लीन आणि जर्कमध्ये ११५ किलो असे एकूण २०२ किलोचे वजन उचलत रौप्यपदक जिंकले. मीराबाईकडून २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्येही पदकाची अपेक्षा केली जात होती. परंतु, त्यावेळी तिने निराशा केली होती. यंदा मात्र तिने जिद्दीने खेळ करताना कर्णम मल्लेश्वरीचा विक्रम मोडीत काढला. मल्लेश्वरीने २००० सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत भारताला वेटलिफ्टिंगमधील पहिले पदक जिंकवून दिले होते.