हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. अशातच आता काही तासानंतर हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडेच्या निधनाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या मते, काल रात्री (23 मे ) रोजी अभिनेते नितेश पांडे यांचे वयाच्या 51 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
हॉटेलमध्ये आला हृदयविकाराचा झटका
इगतपुरी येथील ड्यु ड्रॉप हॉटेलमध्ये अभिनेते नितेश पांडे कामानिमित्त थांबले होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या रूममध्ये हॉटेल स्टॉपने फोन केला असता पांडे यांनी फोन उचलला नाही. पांडे हे काही कामात असतील म्हणून वेटरने पुन्हा रात्री पावणे बाराच्या सुमारास रूमच्या फोनवर फोन केला तसेच त्यांच्या खाजगी मोबाईलवर फोन केला. मात्र, नितेश पांडे यांनी फोन आणि मोबाईल दोन्ही उचलले नाही. यामुळे हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी सदर घटना हॉटेल मॅनेजर यांना सांगितली. हॉटेल मॅनेजर यांनी दुसऱ्या चावीने सदर रूमचा दरवाजा उघडला असता नितेश पांडे हे त्यांच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळले. तेथून त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आले परंतु इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नितेश पांडे यांचा जन्म 17 जानेवारी 1973 रोजी झाला होता. नितेश पांडे यांनी 1995 पासून टेलिव्हिजनच्या दुनियेत काम करण्यास सुरुवात केली. ‘तेजस’, ‘सया’, ‘मंजिलें अपनी अपनी’, ‘जस्तजू’, ‘हम लड़कियाँ’, ‘सुनैना’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘एक रिश्ता पार्टनरशिप का’, ‘महाराजा की’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘ओम शांती ओम’ चित्रपटात ते शाहरुख खानच्या असिस्टंटच्या भूमिकेत दिसले होता. याशिवाय, ते दिशा परमार आणि नकुल मेहता यांच्या ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार’ मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. याशिवाय त्यांनी हिंदी टेलिव्हिजनवर अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
नितेश पांडे यांचे वैयक्तिक आयुष्य
नितेश पांडे यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर त्यांनी अश्विनी कालेस्कर यांच्याशी लग्न केले. 1998 मध्ये दोघांनी लग्न केले. पण 2002 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजन अभिनेत्री अर्पिता पांडेशी लग्न केले.
हेही वाचा :