कॉमेडी किंग कपिल शर्माचा ‘फॅमिली टाईम विथ कपिल’ हा शो अचानक टीव्हीवर बंद झाल्यानंतर आता ‘कॉमेडी सर्कस’ पुन्हा एकदा परतत असल्याची बातमी आहे. हा शो परत येत असतानाच कॉमेडी क्वीन भारती सिंह आणि कॉमेडीचा बादशाह कृष्णा अभिषेक पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून प्रेक्षकांना ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान भारतीनं याबाबत वेळ लागणार असून कृष्णा सध्या चित्रपटात व्यस्त असून हा शो कोणत्या चॅनेलवर येणार हे अजून ठरलं नसल्याचं ‘ई स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
१५ ऑगस्टपासून शो ला होणार सुरुवात
हा शो १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं भारतीनं स्पष्ट केलं आहे. कृष्णा आणि भारती ही जोडी ‘द ड्रामा कंपनी’ मधून शेवटी प्रेक्षकांसमोर आली होती. दरम्यान ‘स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही स्क्रिनवर येऊ आणि यावेळी चांगला आणि मोठा शो घेऊन येऊ. ड्रामा कंपनीवर खूप काम केलं मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकलो नाही. तरीही ८ महिने हा शो चालला. यावेळी केवळ शो नाही तर त्यातील कंटेटदेखील मोठा आणि चांगला असेल. प्रेक्षकांनी आम्हाला इतकं पाहिलं आहे की, प्रत्येक नवी असाईनमेंट आमच्यासाठी आव्हान आहे’ अशा शब्दांत भारतीनं आपली भावना व्यक्त केली. सध्या भारती ‘खतरों के खिलाडी’ या रियालिटी शो चा भाग असून चित्रीकरणासाठी आपला पती हर्ष लिंबाचियाबरोबर अर्जेंटिनामध्ये पोचली आहे.
कृष्णानंही दिला दुजोरा
कॉमेडियन कृष्णा अभिषेकनंदेखील या बातमीला दुजोरा देत सलमान खान प्रॉडक्शन हाऊस या प्रोजेक्टसाठी काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘दस का दम या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी सलमानला आम्ही भेटलो आणि सलमान यासंदर्भात अतिशय सकारात्मक होते. मी आणि भारती त्यांना आवडत असून आमच्यावर त्यांचं प्रेम आहे.’ अशा शब्दात कृष्णानं या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यामुळं ऑगस्टमध्ये हा शो आल्यानंतरच ही जोडी पुन्हा काय कमाल दाखवणार हे स्पष्ट होईल.