आज कंगना रनौत तिचा वाढदिवस साजरा करत आहे, परंतु तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी कंगनाला एक मोठ्ठा झटका बसलेला आहे. याचं कारण म्हणजे कंगना रनौतने अंधेरी येथील मजिस्ट्रेट कोर्टामध्ये लेखक जावेद अख्तर यांच्या विरोधात अपील केलं होतं की, लेखक जावेद अख्तर यांच्या प्रकरणात हजर राहण्यापासून तिला सुटका मिळावी. परंतु कोर्टाने कंगनाची ही याचिका आता फेटाळून लावलेली आहे. मंगळवारी या केसची सुनावणी होती, परंतु कंगना त्यावेळी कोर्टामध्ये गैरहजर होती.
कोर्टाने कंगना रनौतची याचिका फेटाळत सांगितले की, गरज भासल्यास कंगनाला काही विशिष्ट परिस्थितीत कोर्टाकडून सूट दिली जाईल. खरंतर हे प्रकरण २०२० मधील आहे, जेव्हा प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा केल्याची तक्रार दाखल केली होती. जून २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांवर खोचक टीका केल्या होत्या. त्यावेळी एका इंटरव्ह्यूमध्ये तिने लेखक जावेद अख्तर यांना बॉलिवूडमधील सुसाइड गँगशी जोडले होते, इतकंच नाही तर ते त्या गँगचा भाग आहेत, जे बाहेरून आलेल्यांना त्याचं आयुष्य संपवण्यासाठी परावृत्त करतात. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे लेखक जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा दावा केला असून, खटला कोर्टात दाखल केला होता.
या प्रकरणात कंगनाने सुद्धा जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, या तक्रारीमध्ये कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर खंडणीदार आणि गुन्हेगार अशी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये कंगना म्हणाली की, ती २०१६ मध्ये तिची बहीण रंगोली चंदेल सोबत जावेद अख्तर यांच्या घरी गेली होती. त्यावेळी कंगना आणि ऋतिक रोशनच्या अफेअरची बातमी समोर आली होती. कंगनाने तक्रार केली की, जावेद अख्तरने तिला दुर्भाग्यपूर्ण, वाईट हेतूने घरी बोलावलं आणि तिला धमकी दिली होती.
हेही वाचा :The kashmir files या चित्रपटावर आता आमिर खान म्हणतो…