घरफिचर्ससाहित्य समीक्षक वा. म. जोशी

साहित्य समीक्षक वा. म. जोशी

Subscribe

वामन मल्हार जोशी हे मराठी कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्वचिंतक होते. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1882 रोजी कुलाबा जिल्ह्यातील तळे या गावी झाला. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र हे विषय घेऊन एम.ए. झाले (१९०६). त्यानंतर कोल्हापूर येथे समर्थ विद्यालयात अध्यापनाचे काम केले. त्यानंतर विश्ववृत या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही स्वीकारली. याच मासिकात १९०८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘वैदिक धर्माची तेजस्विता’ या लेखाबद्दल राजद्रोहाचा आरोप होऊन त्यांना तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर (१९११) पाच वर्षे केसरी-मराठा संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर मेसेज या इंग्रजी दैनिकाचे ते उपसंपादक होते. पुढे महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील पाठशाळेत प्राध्यापक म्हणून ते दाखल झाले (१९१८) व सेवानिवृत्तीपर्यंत त्याच संस्थेत वेगवेगळ्या पदांवर काम करीत राहिले.

‘रागिणी’ अथवा ‘काव्यशास्त्रविनोद’ (१९१५) या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर ‘आश्रमहरिणी’ (१९१६), ‘नलिनी’ (१९२०), ‘सुशिलेचा देव’ (१९३०), ‘इंदु काळे व सरला भोळे’ (१९३४) या चार कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. वाचकांचे मनोरंजन करण्यापेक्षा त्याला विचार करावयास लावण्यासाठी त्यांचे कादंबरीलेखन मुख्यतः झालेले आहे. त्यातून त्यांची तत्त्वचिंतक वृत्ती प्रकर्षाने व्यक्त होते. कर्तव्य आणि ध्येयनिष्ठा, कलाप्रेम आणि नीतिबंधने, बुद्धी आणि श्रद्धा, व्यक्तिस्वातंत्र आणि सामाजिक-नैतिक बंधने यांसारखे जीवनविषयक मौलिक प्रश्न त्यांनी आपल्या कादंबर्‍यांतून उपस्थित केले.

- Advertisement -

कादंबर्‍यांप्रमाणेच त्यांच्या अन्य लेखनालाही एक लक्षणीय वैचारिक बैठक आहे. राष्ट्रवाद, गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद इ. प्रभावी विचारप्रणालींच्या ऐन उत्कर्षाच्या काळात त्यांचे लेखन झाले. त्यांचे साहित्य समीक्षात्मक लेखनही केले. त्यातून साहित्यविषयक मूलभूत प्रश्न उपस्थित करून त्यांची सोडवणूक कोणत्या दृष्टीने करावी, याचे अचूक मार्गदर्शन त्यांनी केले. अशा या श्रेष्ठ साहित्य समीक्षकाचे २० जुलै १९४३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -