घरफिचर्ससाहित्यिक गंगाधर गाडगीळ

साहित्यिक गंगाधर गाडगीळ

Subscribe

गंगाधर गाडगीळ हे आधुनिक मराठी साहित्यिक. त्यांनी कथा, कादंबरी, प्रवासवृत्त, समीक्षा, नाटक, बालसाहित्य, अर्थशास्त्रविषयक इ. विविध प्रकारचे लेखन केले. त्यांचा जन्म 25 ऑगस्ट 1923 रोजी झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन एम. ए. केले. १९४६ पासून २५ वर्षे अर्थशास्त्राचे प्राध्यापक या पदावर काम केले. महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी कथालेखनास प्रारंभ केला आणि एक नामवंत नवकथाकार म्हणून लौकिक मिळविला. मानसचित्रे (१९४६), कडू आणि गोड (१९४८), नव्या वाटा (१९५०), तलावातील चांदणे (१९५४), पाळणा (१९६१) हे त्यांचे काही उल्लेखनीय कथासंग्रह. वेगळे जग (१९५८), गाडगीळांच्या कथा (१९५८) व गुणाकार (१९६५) या संग्रहांत त्यांच्या निवडक कथा एकत्र केलेल्या आहेत. मराठी कथेला वेगळे वळण देण्यात गाडगीळांचा वाटा मोठा आहे.

मानवाचे बाह्यवर्तन आणि अंतर्गत भावविश्व यांत अनेक कारणांनी विसंगती निर्माण होते, याची जाण ठेवून त्याच्या अनपेक्षित, उठवळ व चमत्कारिक उक्तिकृतींमागील सूक्ष्म-तरल भावना व संवेदना आणि सुप्त मनातील संज्ञाप्रवाह यांचा गाडगीळांनी वेध घेतला. यंत्रयुगातील शहरी जीवनातल्या ताणाबाणांचे सूक्ष्मसूचक दर्शन त्यांच्या कथांनी घडविले आहे. नवीन्यपूर्ण प्रतिमा व लवचिक, मार्मिक शब्दकळा यामुळे त्यांच्या कथांतील जीवनदर्शन कलात्मक झाले आहे. साचेबंद घटनाप्रवणता कमी करून मनोविश्लेषणावर भर देणारी जी नवकथा १९४५ पासून रूढ झाली, तिचे ते अध्वर्यू समजले जातात. गाडगीळांच्या कथाविश्वातील व्यक्ती मध्यमवर्गीयच असल्या, तरी त्यांच्या अनुभवांकडे सखोलतेने पाहण्याच्या वृत्तीमुळे त्यातील जीवनदर्शन अस्सल वाटते. लैंगिक मनोवृत्तींचा वास्तव संघर्ष चित्रित करणारी लिलीचे फूल (१९५५) ही त्यांची पहिली कादंबरी होय. लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील दुर्दम्य (खंड १,१९७० आणि खंड २,१९७२ ) ही त्यांची कादंबरी म्हणजे चरित्रात्मक कादंबरीलेखनाचा मराठीतील एक महत्त्वाचा प्रयोग होय.

- Advertisement -

मुंबईच्या तरुण कारकुनांच्या जीवनातील छोट्यामोठ्या विसंगती रंगविणारी खरं सांगायचे म्हणजे (१९५४) आणि बंडू (१९६१) ही पुस्तकेही त्यांच्या उपहासप्रचुर, खुसखुशीत व हलक्याफुलक्या विनोदनिर्मितीचा प्रत्यय देतात. ललित साहित्याच्या सिद्धांताची आणि नवसाहित्याच्या स्वरूपाची चर्चा करणारे खडक आणि पाणी (१९६०) व विविध साहित्यप्रकारांतील अभिजात मराठी ग्रंथांचे रहस्योद्घाटन करणारे साहित्याचे मानदंड (१९६२) ही त्यांची पुस्तके साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात मान्यता पावली आहेत. लखूची रोजनिशी (१९४८), मार्क ट्वेनच्या टॉम सॉयर ह्या कादंबरीवरून लिहिलेले धाडसी चंदू (१९५१), आम्ही आपले थोर पुरुष होणार (१९५७) ह्यांसारखी बालांसाठी त्यांनी लिहिलेली पुस्तकेही लोकप्रिय झाली आहेत. मुंबई आणि मुंबईकर (१९७०) ह्याचा त्यांच्या पुस्तकात मुंबईतील लोकजीवनाची जडणघडण कशी झाली, ह्याचा इतिहास वेधक शैलीत मांडलेला आहे. आर्थिक प्रश्न व अर्थरचना (१९५३), नियोजन आणि समृद्धी (१९६१) ही त्यांची काही अर्थशास्त्रविषयक पुस्तके आहेत. अशा या महान साहित्यिकाचे 15 सप्टेंबर 2008 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -