घरफिचर्ससारांशभदोहीतील सीता समाहिता मंदिर

भदोहीतील सीता समाहिता मंदिर

Subscribe

रामायणातील सर्वात जास्त हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग या ठिकाणी घडला. रावणाचा वध केल्यानंतर अग्निदिव्य केलेल्या सीता, लक्ष्मण, श्रीराम वनवासाचा कालावधी पूर्ण झाल्यावर अयोध्येला परत आले. त्यानंतर श्रीरामाचा राज्याभिषेक झाला. राम आणि सीता राजा-राणी म्हणून अयोध्येवर राज्य करू लागले. त्यावेळी एका नागरिकाने घेतलेल्या संशयावरून श्रीरामने सीतेचा त्याग केला. लक्ष्मणाने पवित्र, निरपराध सीतेला दूर वनात सोडून दिले. भदोही जिल्ह्यातील हेच ते ठिकाण आहे जेथे सीतामातेने दुसरा कठोर वनवास एकटीने भोगला. येथेच वाल्मिकी ऋषींनी सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला.

-विजय गोळेसर 
रामायण यात्रा दर्शनच्या भाग ४ मध्ये आपण जानकीचे बालपण जेथे गेले आणि ती श्रीरामाशी जेथे विवाहबद्ध झाली त्या जनकपूरचे दर्शन घेतले. आज आपण सीतामातेने जेथे समाधी घेतली, जेथे ती धरणीमातेच्या कुशीत विसावली त्या भदोही येथील सीता समाहिता मंदिराचे दर्शन घेणार आहोत. रामायणातील सर्वच प्रसंग आणि स्थळं महत्त्वाची आहेत. भदोही जिल्ह्यात सीता समाहिता नावाचे स्थान आहे. समाहिता म्हणजे समाधी. ज्या ठिकाणी सीतामाता स्वत:च धरणीमातेच्या कुशीत विसावली ते हे स्थान. अलाहाबाद आणि वाराणशी यांच्यामध्ये जंगीगंज बाजारपासून ११ किमी अंतरावर गंगेच्या किनार्‍यावर हे स्थान आहे.
रामायणातील सर्वात जास्त हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग या ठिकाणी घडला. रावणाचा वध केल्यानंतर अग्निदिव्य केलेल्या सीता, लक्ष्मण, श्रीराम वनवासाचा कालावधी पूर्ण झाल्यावर अयोध्येला परत आले. त्यानंतर श्रीरामाचा राज्याभिषेक झाला. राम आणि सीता राजा-राणी म्हणून अयोध्येवर राज्य करू लागले. त्यावेळी एका नागरिकाने घेतलेल्या संशयावरून श्रीरामने सीतेचा त्याग केला.
लक्ष्मणाने पवित्र, निरपराध सीतेला दूर वनात सोडून दिले. भदोही जिल्ह्यातील हेच ते ठिकाण आहे जेथे सीतामातेने दुसरा कठोर वनवास एकटीने भोगला. येथेच वाल्मिक ऋषींनी सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला. येथेच सीतेने लव आणि कुश यांना जन्म दिला. वाल्मिक ऋषींच्या आश्रमात लव-कुश लहानाचे मोठे झाले. वाल्मिक ऋषींनीच  त्यांना वेदांचे आणि धनुर्विद्येचे शिक्षण दिले.
त्याचवेळी अयोध्येत सार्वभौम होण्यासाठी श्रीरामाने अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले. अश्वमेध यज्ञाचा घोडा जेव्हा येथे वाल्मिकींच्या आश्रमाजवळ आला तेव्हा लव-कुशांनी तो घोडा पकडला. एवढेच नाही तर या घोड्याचे रक्षण करणार्‍या हनुमानाला त्यांनी बंदी बनवले आणि आपल्या मातेसमोर म्हणजे सीतेसमोर आणले. हे जेव्हा अयोध्यापती श्रीरामांना समजले तेव्हा ते स्वत: येथे आले.
लव-कुश, सीता आणि श्रीराम  यांची भेट झाली. त्यानंतर अयोध्येला परत न जाता सीतादेवीने धरणीमातेला आपल्याला कुशीत घेण्याची प्रार्थना केली आणि धरणीमातेनेदेखील सीतादेवीला आपल्यात सामावून घेतले. जमिनीतून जन्मलेली सीता पुन्हा धरणीमध्ये समाहित झाली. हा संपूर्ण प्रसंग येथे घडला अशी मान्यता आहे. या ठिकाणी सीतामातेचे अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे.
वाल्मिकी आश्रम 
सीता समाहिता स्थळापासून जवळच वाल्मिक ऋषींचा आश्रम आहे. येथे लव-कुश यांच्या बालमूर्ती आहेत. आश्रमाच्या प्रवेशद्वारावर लव आणि कुश यांनी हनुमानाला दोरीने बांधले असून जवळच अश्वमेधाचा अश्व त्यांनी पकडला अशा प्रतिमा आहेत.
भदोही उत्तर प्रदेशातील एक जिल्हा आहे. ज्ञानपूर हे या जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. प्रयागराज आणि वाराणशी यांच्यामध्ये जंगीगंज बाजारपासून ११ किमी अंतरावर गंगेच्या किनार्‍यावर हे ठिकाण आहे. भदोहीपेक्षा सीतामढी म्हणूनच हे ठिकाण अधिक प्रसिद्ध आहे. वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास यांच्या कवितावलीत या स्थानाचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
आपल्या दुसर्‍या वनवासात सीतामातेने येथे अनेक कष्ट भोगले. जनक राजाची राजकन्या आणि साक्षात भगवान श्रीरामाची अर्धांगिनी, स्वत:ही साक्षांत लक्ष्मीचे रूप असलेल्या सीतेला एवढे कष्ट भोगावे लागले. असंख्य अडचणी आणि त्रास सहन करावा लागला, पण तिने ते तक्रार न करता भोगले. केवढा मोठा धडा सीतामाईने जगाला दिला. उगाच नाही सीतेला जगत्जननी म्हणतात.
सीता केश वाटिका 
लव-कुश आणि सीतामाता येथे राहिल्याच्या अनेक खुणा येथे पाहायला मिळतात. या भागात विशिष्ट प्रकारचे गवत उगवते, जे दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही. या वैशिष्ठ्यपूर्ण गवताची एक अतिशय सुंदर बाग येथे विकसित करण्यात आली आहे. या वाटिकेला सीता केश वाटिका असे म्हणतात.
११०  फूट  उंच  हनुमान 
  या ठिकाणचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील अतिशय विशाल, भव्य हनुमान मूर्ती. लव-कुश यांनी येथे बजरंगबलीला बंदी बनवले होते. या घटनेचा आधार घेऊन जगातील सर्वांत उंच हनुमान मूर्ती येथे तयार करण्यात आली आहे. मंदिर परिसरात प्रवेश केल्याबरोबर दुरूनच  ११० फूट उंचीची हनुमान मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. या परिसरातील ही सर्वांत उंच हनुमान मूर्ती आहे असे म्हणतात.
या उंच हनुमान मूर्तीखाली असलेल्या मोठमोठ्या दगडाखाली एक भुयार आहे. या भुयारात हनुमानाचे मंदिर आहे. सगळा परिसर अतिशय उत्तम प्रकारे विकसित केलेला आहे. या भुयारातील हनुमान मंदिरदेखील सुंदर टाईल्स लावून सुशोभित केले आहे. मन प्रसन्न करणारे वातावरण येथे अनुभवता येते. जवळच भगवान शंकराची मूर्ती आणि उंच पायर्‍यांवर पाण्याचा मोठा कृत्रिम धबधबा तयार केलेला आहे. येथे सतत पाणी वाहत असते. येथून थोड्या अंतरावर सीतेचे अतिशय सुंदर आणि भव्य दुमजली मंदिर आहे.
मंदिराभोवती मोठा जलाशय आणि त्याच्या कडेला चारीबाजूंनी घनदाट झाडे आहेत. अतिशय निसर्गरम्य असे हे स्थान आहे.मंदिर संगमरवरी आहे. मंदिरातील भिंतीवर श्रीराम आणि सीता यांच्या जीवनात घडलेले रामायणातील  जवळजवळ सर्व प्रसंग मधुबनी पद्धतीच्या पेंटिंगने चित्रीत केले आहेत. मंदिराच्या वरच्या मजल्यावर सीतेचे राजसी रूप साकारले आहे. मंदिराच्या खालच्या मजल्यावर किंवा तळघरात धरणीच्या कुशीत जाणारी  सीतामातेची संगमरवरी मूर्ती आहे.
येथे एक-दोन मिनिटे शांत उभं राहिल्यावर सीतामातेचे सर्व चरित्र आठवते आणि सीतादेवी याच ठिकाणी धरणीच्या कुशीत गेली या विचाराने अंगावर शहारे आणि डोळ्यांत अश्रू येतात. मन भारावून जाते. आपण जणू त्या क्षणांचे साक्षीदार होतो. भारताचे दिवंगत राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या पत्नी विमलजी शर्मा यांच्या हस्ते १९९७ मध्ये या सीता समाहिता मंदिराचे लोकार्पण करण्यात आले होते.
कसे जावे-
वाराणशीपासून भदोही ५८ किमी अंतरावर आहे. वाराणशीपासून रेल्वेने तसेच बसमार्गाने भदोहीला जाता येते. गंगेच्या प्रदेशात वसलेला भदोही हा उत्तर प्रदेशमधील सर्वांत लहान जिल्हा आहे. जौनपूर, वाराणशी, मिर्झापूर आणि प्रयागराज या जिल्ह्यांच्या मधोमध भदोही वसले आहे. भदोहीचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे हाताने विणलेले कार्पेट तयार करणारे देशातील सर्वांत मोठे केंद्र आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -