घरफिचर्ससमाजसुधारक पेरियार रामस्वामी

समाजसुधारक पेरियार रामस्वामी

Subscribe

पेरियार (नायकर) ई. व्ही. रामस्वामी यांचा आज स्मृतिदिन. रामस्वामी हे द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर आत्मा) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक होते. त्यांचे पूर्ण नाव एरोड व्यंकटप्पा रामस्वामी नायकर होते. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 रोजी तामिळनाडूतील एरोड येथे कन्नडा नायकर जमातीतील संपन्न कर्मठ हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यंकटप्पा हे व्यापारी होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त तीन वर्षेच झाले. त्यांनी वडिलांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यास सुरुवात केली.

लहानपणापासूनच ते परंपरावादी, अंधश्रद्धा व धर्मग्रंथांतून सांगितलेल्या विचारांवर नेहमीच प्रश्न उठवत असत. गरीब आणि अस्पृश्य यांची परिस्थिती पाहून त्यांचे मन क्षुब्ध झाले व त्यांनी धर्मग्रंथांचा चिकित्सापूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा डळमळली आणि त्यांनी सामाजिक समानतेचा व अस्पृश्योद्धाराचा प्रसार सुरू केला. १९०५ पासून त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. याच काळात एरोडमध्ये प्लेगची साथ पसरली होती. अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले, त्यामुळे अनेक श्रीमंत व्यापार्‍यांनी एरोडमधून स्थलांतर केले. पण रामस्वामींनी रोग्यांची सेवाशुश्रूषा केली.

- Advertisement -

१९१८ मध्ये ते एरोड नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. १९२० मध्ये महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वैक्कोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. काँग्रेसमधील वरिष्ठवर्णीयांच्या धोरणाबद्दल मनात असंतोष निर्माण होऊन त्यांनी पक्षत्याग केला. तमिळ व उपेक्षित समाजाला ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात संघटित केले. पददलित समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी १९२५ साली स्वाभिमान आंदोलन सुरू केले.

आंतरजातीय विवाह व विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तसेच देवदासीप्रथा बंद करण्यासाठीच्या विधेयकास पूर्ण पाठिंबा दिला. १९३१ मध्ये त्यांनी रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स व स्पेन या देशांचा दौरा केला. १९३३ मध्ये त्यांनी लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले आणि त्यामुळे पुन्हा त्यांना बंदिवास भोगावा लागला. १९७१ मध्ये त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन संमेलन भरवून धर्म, जात व भाषा यांच्या आधारावर होणारा सर्व प्रकारचा पक्षपात दूर करण्याचे सरकारला आवाहन केले.

- Advertisement -

१९३४ पासूनच त्यांनी सामाजिक क्रांतीला वाहून घेतले होते. हिंदू धर्म हे ब्राह्मणांच्या वर्चस्वाचे व मक्तेदारीचे एक साधन आहे. मनुस्मृति ही अमानुष आहे आणि पुराणे म्हणजे परीकथा आहेत, अशी त्यांची मते होती. वर्णव्यवस्था, बालविवाह, सक्तीचे वैधव्य याविरुद्ध ते सतत प्रचार करीत. द वर्ल्ड टू कम, व्हाय द राइट्स फॉर कम्युनल रिझर्व्हेशन, वर्ड्स ऑफ फ्रीडम : आयडिया ऑफ नेशन, सच्ची रामायण हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. कुटियरसू (१९२५), रिव्होल्ट (१९२८), पकुत्तरिवू (१९३४), विधुथालई या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. अशा या थोर समाजसुधारकाचे २४ डिसेंबर १९७३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -