दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान आज शारजाच्या मैदानावर धावसंख्येचा विक्रम मोडताना दिसला दोन्ही संघानी मिळून ४०० धावांच्या वर संख्या रचली. मात्र दिल्ली कॅपिटल्सने दिलेले २२८ धावांचे आव्हान कोलकाता पेलता आले नाही. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात अखेर कोलकाताचा पराभव झाला. मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ यांनी केलेल्या आक्रमक अर्धशतकांमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २२८ अशी धावसंख्या उभारली. ही यंदाच्या मोसमात कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कोलकाताच्या संघाने चांगली सुरुवात केली होती. शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी ८ षटकात ७२ धावा काढल्या होत्या. शुमभन गिल २२ चेंडूत २८ धावा करुन अमित मिश्राचा शिकार ठरला.नितीश राणाने ३५ चेंडूत ५८ धावा काढत तडाखेबाज अर्धशतक पुर्ण केले. मात्र त्यानंतर आलेल्या आंद्रे रसल, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स यांना फार मोठी धावसंख्या रचता आली नाही.
पण कोलकात्याच्या इनिंगमध्ये खरी रंगत आणली ती मॉर्गन आणि राहुल त्रिपाठीने दोघांनीही २०० च्या वर स्ट्राइक रेट ठेवत ताबडतोब धावा काढल्या. दोघांच्या तडाख्यामुळे हा सामना कोलकाता जिंकतो काय? अशीही शंका येत होती. मात्र स्टॉयनिस आणि नॉर्जे यांनी शेवटच्या दोन षटकात टिच्चून मारा केल्यामुळे मॉर्गन आणि त्रिपाठीचे काहीच चालू शकले नाही. मॉर्गन १८ चेंडूत ४४ तर राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत ३६ धावा ठोकल्या. मात्र अखेर १८ धावांनी कोलकाताला पराभव स्वीकारावा लागला.