नांदगाव भागात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्याने मालमत्तेसह मोठी पिकांचंही मोठं नुकसान झालं. दरम्यान, लेंडी नदीला पूर आल्याने नदीकाठावरची अनेक घरं वाहून गेली, तर या भागातल्या पोट्री शेडमधल्या तब्बल १० हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला.
गेल्या दोन दिवसांपासनं सुरू असलेल्या पावसामुळे आधीच नांदगाव शहर परिसर जलमय झालेला होता. त्यातच काल रात्री ढगफुटीसारखा पाऊस झाल्यानं नदी-नाले दुथडी भरून वाहिले, तर रस्तेही पाण्याखाली गेलेले होते. लेंडी नदीवरचा सब-वे ते रेल्वे स्टेशनपर्यंत भुसावळ-मुंबई लोहमार्गावर पाणी साचल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेला होता. त्यामुळे अनेक रेल्वे थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या पावसामुळे लेंडी आणि शाकंबरी नदीलाही मोठा पूर आला. दहेगाव नाका, गुलजारवाडी परिसरातल्या नागरिकांच्या घरांमध्ये गुडघ्याएवढं पाणी साचलं होतं.