सातत्याने पडणाऱ्या पावसाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला झोडपून काढले आहे. जून महिन्यात पडणार्या एकूण पावसाच्या तुलनेत मागील चार दिवसांतच मुंबईत ८५ टक्के पाऊस पडला आहे. या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. तसेच रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसामुळे मंगळवारी मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आणि आता याचा फटका एसटीला देखील बसला आहे. शहरात कोसळणाऱ्या मुसळधार सरींनी राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीलाही ब्रेक लागला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर परिसरातील तब्बल ५६८ एसटी फेऱ्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. यामुळे एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
यामुळे फेऱ्या रद्द करण्यात आल्या
जोरदार पावसामुळे सायन सर्कलजवळ गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे परळ बस स्थानकातून मुंबईच्या बाहेर जाणारी वाहतूक वडाळामार्गे वळवण्यात आली. दरम्यान, बसस्थानक आणि आगरात प्रवासी देखील नव्हते. त्यातच राज्य सरकारने सतर्कतेचा देखील इशारा दिल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यतेनुसार एसटी फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या. तर दादर – पुणे, ठाणे – नाशिक आणि कोंकण मार्गांवरील एसटीसेवा सुरळीत असल्याची माहिती एसटी महामंडळांनी दिली.
५६८ फेऱ्या रद्द
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड विभागातून रोज सायंकाळी ४ पर्यंत एकूण ३ हजार ६९९ एसटी फेऱ्या पार पडतात. मात्र, मंगळवारी झालेले पावसामुळे ५६८ एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये मुंबई १९५, पालघर १९५, रायगड ६५ आणि ठाणे येथील ११३ या विभागातील एकूण ५६८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ३ हजार १८१ फेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या असून राज्यातील अन्य जिल्ह्यांत एसटी फेऱ्या नियोजनाप्रमाणे सुरु होत्या असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.
हेही वाचा – तिवरे धरण फुटले; ७ गावांना फटका; २४ जण बेपत्ता
हेही वाचा – मुंबईचा धोका टळला; आता विदर्भात अतिवृष्टीचा इशारा