मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. राज ठाकरेंनी भडकाऊ भाषण केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत राज ठाकरेंनी मनसैनिकांना मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. भाषण करणं सोपं आहे. पण अशी भडकाऊ भाषण करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार का? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन आणि नुतन इमारत उद्घाटन कार्याक्रमात अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी संबोधित करताना अजित पवारांनी राज ठाकरेंना सवाल केला आहे.
अजित पवार म्हणाले की, काही लोकं जातीय तेढ निर्माण करण्यासारखी भाषणे करत आहेत. भोंगे लावण्यास सांगत आहेत. भाषण करणं सोपं आहे परंतु अशा प्रकारची भडकाऊ भाषणं करुन रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे का? त्यांचे नगरसेवक देखील त्यांच्या मताशी सहमत नाहीत. कोणाला तरी बरं वाटण्यासाठी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य करत आहेत. असा खोचक टोला अजित पवार यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
समाजात तेढ निर्माण केला जातोय – गृहमंत्री
राज्यात वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलन करण्यात येत आहेत. राजकारण म्हणून आंदोलन केलं जात आहे. याचे पडसाद राज्यात अनेक जिल्ह्यात उमटले आहेत. पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. राज्यात सध्या हनुमान चालीसा आणि अजान वरुन वाद निर्माण झाला आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळाव्यात असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.
राज ठाकरेंची भूमिका काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोग्यांविरोधात वक्तव्य केले होते. मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा दुप्पट आवाजात वाजवण्यात येईल असा इशारा आणि मनसैनिकांना आदेशच राज ठाकरे यांनी दिले आहेत.यानंतर महाराष्ट्रातील मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.