नाशिक : आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडी आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती झाली याबाबत राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनीही युतीबाबत बोलतांना दोन्ही गटाला शुभेच्छा दिल्या. मात्र निवडणूकांपुरती युती जनता जनार्दन मान्य करत नाही असा टोलाही मंत्री भुसे यांनी लगावला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बोलतांना पालकमंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही मुददे मांडले आहेत. आचारसंहीतेनंतर होणार्या बैठकीत नाशिकच्या विकासासंदर्भात आराखडा आम्ही सादर करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत बोलतांना त्यांनी दोन्ही गटाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, शेवटी मुळ जी विचारसरणी आहे ती महत्वाची असते. निवडणूकांपुरते आपण एकत्र आलो तर जनता जनार्दन मान्य करत नाही. प्रत्येक गोष्ट निवडणूक आणि मतांसाठी करणार तर जनतेला हे मान्य नसते असे सांगत दुसर्याच्या घरात डोकवण्याचे काही कारण नाही. राज्याचा सर्वांगिण विकास कसा होईल, कष्टकर्याला न्याय कसा मिळेल हे आमचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधर निवडणूकीबाबत अद्याप पक्षाचा कोणताही आदेश आलेला नाही. पक्षाचा जो आदेश येईल त्यानूसार काम करणे ही शिवसैनिकांची जबाबदारी असते त्यामुळे आदेश आला की त्यानूसार काम करू असेही ते म्हणाले.