मुंबई – राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय भूकंप करून समर्थक आमदारांसह बंड पुकारले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपशी संधान बांधले आणि सत्तेची खुर्ची मिळवली. शिवसेना पक्षावरील ताब्यावरून न्यायालयात सत्तासंघर्ष सुरू आहे. आता दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी उद्धव ठाकरे व शिंदे गट यांनी वेगवेगळे अर्ज सादर केल्याने हे दोन्ही गट आमनेसामने उभे ठाकले आहेत.
या दोन्ही गटांचे अर्ज पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयात जमा झाल्याने संबंधित पालिका अधिकाऱ्यांसमोर नवीन राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील शिवसैनिकांना प्रश्न पडला आहे की, दसरा मेळाव्यासाठी मैदान कोणाला मिळणार, कोण बाजी मारणार?
हेही वाचन – महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याची मनसेकडून हकालपट्टी; पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, शिवसेनेची स्थापना केल्यापासून ते त्यांनी अंतिम श्वास घेईपर्यंत शिवाजी पार्कवर आपल्या ठाकरी शैलीतील भाषणाने दसरा मेळावा गाजवला. मात्र त्यानंतर शिवसेनेची जबाबदारी सांभाळणारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, अपवादात्मक परिस्थिती वगळता दसरा मेळावा याच शिवाजी पार्कवर गाजवला. मात्र राज्यातील सत्तासंघर्ष व मुख्यमंत्री पदावरून भाजपशी काडीमोड झाल्याने शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी नाईलाजाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी स्थापित करून ‘महाविकास आघाडी’चे सरकार बनवले व ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले. मात्र अडीच वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत मूळ सेनेचे ४९ आमदार फोडले आणि भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संधान बांधले आणि युतीचे सरकार स्थापित करून शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.
हेही वाचा – ‘ही’ प्रार्थना करताच बाप्पा बघून हसले… किरीट सोमय्यांचे लालबागच्या राजाला साकडे
मात्र खरा संघर्ष आता सुरू झाला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर शिंदे गटाने दावा केल्याने व त्यास उद्धव ठाकरे गटाने विरोध केला आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणी व निकालासाठी रखडले आहे. मात्र शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात छोट्या – मोठ्या प्रकरणावरून संघर्ष सुरूच आहे.
आता ५ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा आहे. शिवसेनेच्या परंपरेनुसार यंदा कोरोना नियंत्रणात असल्याने दसरा मेळावा पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयात शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून आपला अर्ज सादर केला आहे. त्यानंतर शिवसेनेने संबंधित कार्यलयाकडे पाठपुरावा करीत स्मरणपत्रही दिल्याचे समजते. मात्र पालिकेने त्यांना होकार किंवा नकारही कळलेला नाही. तर दुसरीकडे शिंदे गटातर्फे ३० ऑगस्ट रोजी जी/ उत्तर कार्यलयाला दसरा मेळावा त्याच दिवशी शिवाजी पार्कवर घेण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा आपला अर्ज सादर केला आहे. आता दोन्ही अर्ज आल्याने नेमक परवानगी कोणाला द्यावी, असा पेचप्रसंग पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
हेही वाचा – नव हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात देव कोरडेच राहणार! सामानातून शिंदे फडणवीस सरकारवर जहरी टीका
शिवसेनेचा मेळावा हा शिवाजी पार्क गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित करीत आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेचा पारंपारिक सोहळा आहे. त्यासाठी आम्ही नियमानुसार पालिकेकडे परवानगीसाठी अगोदरच अर्ज सादर केला आहे. त्यामुळे आम्हालाच परवानगी मिळणार असून त्यांचा मुखवटा गळून पडला आहे. शिंदे गटाकडून उगाचच आम्हाला दिवचण्याचा प्रकार सुरू आहे, असं शिवसेना प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या.