घरमहाराष्ट्रपुन्हा मेगाभरती

पुन्हा मेगाभरती

Subscribe

नवी मुंबईचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. बुधवारी ११ सप्टेंबर रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपत प्रवेश करणार आहेत. गणेश नाईक यांच्यासह ५५ नगरसेवक देखील भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहे. याबरोबरच काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील, विधानपरिषद सदस्य आनंदराव पाटील हेही भाजपत प्रवेश करणार आहेत. मात्र काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस सोडली असली तरी ते नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नवी मुंबईतील सर्वेसवा गणेश नाईक यांच्या पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आह

त्यानंतर गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवण्यात येत होते. अखेर नाईकांच्या प्रवेशाचा मुुहुर्त निश्चित झाला असून बुधवारी नेमक्या किती नगरसेवकांबरोबर ते भाजपत प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजता वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गणेश नाईकांचा भाजप प्रवेश होणार आहे. नाईक यांना भाजपचा कोणी केंद्रीय मंत्री किंवा पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करावयाचा होता पण त्यांच्या तारखा जुळून न आल्याने नाईक बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत जाणार आहेत. दरम्यान, नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैचेन वाढली असून बुधवारी दुपारी तातडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

- Advertisement -

नाईक यांच्यासोबत काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याबरोबरच काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आनंद पाटील हे देखील लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. आनंद पाटील यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. आनंद पाटील १३ स्पटेंबर रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कृपाशंकर सिंह यांचा ही राजीनामा
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने आगामी विधान सभेसाठी जोरदार तयारी सुरु केली असताना काँग्रेसला एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, उर्मिला मांतोडकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राज्याचे माजी गृह राज्यमंत्री आणि उत्तर भारतीयांचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी देखील मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवला आहे. मात्र कृपाशंकर सिंह कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कृपाशंकर सिंह हे शिवसेनेत प्रवेश करू शकतात. त्यांचा चांदीवली हा मतदार संघ सध्या शिवसेनेकडे आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते चांदीवली या मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांच्याविरोधात निवडणूक लढवून शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -