मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज, मंगळवारी जयंती आहे. त्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत भाजपा तसेच शिंदे गटावर जहरी टीका केली आहे. आम्ही प्राणपणाने लढणार आणि जिंकणारसुद्धा, असा निर्धारही ठाकरे गटाने याद्वारे केला आहे.
हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यव्यापी अधिवेशनातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार – संजय राऊत
जवळपास दीड वर्षापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने हे दोन्ही शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे शिंदे तसेच ठाकरे गटांमधील तेढ विकोपाला गेली आहे.
साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं ‘बाळकडू‘ पाजलात ते आपल्या भगव्याच्या रक्षणसाठी, तुम्ही आमचे ’दैवत‘ म्हणून पाठीशी उभे राहिलात ते आम्हां निष्ठावंतांना बळ देण्यासाठी!
उभा महाराष्ट्र तुमचा शतश: ऋणी आहे.… pic.twitter.com/JouekMa3PB— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 23, 2024
अशातच देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन होत असताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या व्हिडीओत शिंदे गटाबरोबरच भाजपालाही लक्ष्य केले आहे. आहे. गोरगरीबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे न्यायाचे राज्य टिकवण्यासाठी तसेच तसेच सत्तेच्या मस्तीत माजलेल्या कमळाबाईला अद्दल घडवायला शिवसैनिक बाहेर पडला आहे, असे या व्हिडीओत म्हटले आहे.
हेही वाचा – Balasaheb Thackeray : …आज शिवसेनाप्रमुख हवेच होते, ठाकरे गटाचे भाजपावर शरसंधान
बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माचे बीज रोवून वाढविलेला शिवसेना या वटवृक्षाने संपूर्ण महाराष्ट्राला सावली दिली, त्याच वटवृक्षाच्या मूळांवर घाव घालून ते दुसऱ्यांना देण्याचे पाप केले जात आहे. शिवसेनेमुळे जे या महाराष्ट्रात रुजले, वाढले, फोफावले तेच आज शिवसेनेला संपविण्याचा डाव आखत आहेत, पण तुमचा निष्ठावंत कुठेही गेलेले नाही, असा विश्वास देतानच, बाळासाहेबांनी रुजविलेल्या विचारांसाठी तसेच मराठी बाण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढणार आणि जिंकणार सुद्धा, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.