मुंबईः गेल्या काही दिवसांपासून सरकारनं घेतलेल्या वाईन सुपरमार्केटमध्ये विकण्याच्या निर्णयावर जोरदार रणकंदन सुरू आहे. या निर्णयावरून भाजप नेत्यांनी ठाकरे सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करू पाहतंय का?, असा सवालच उपस्थित केला होता. त्यालाच आता राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी प्रत्युत्तर दिलंय.
मागच्या कॅबिनेटमध्ये ज्या वाईन पॉलिसीचा निर्णय राज्य सरकारनं निर्णय घेतला होता, आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. जी भाजपचं लोक सांगतायत हे बेवड्यांचं राज्य आहे. त्याच भाजपमध्ये सर्वाधिक दारू पिणारी मंडळी आहेत. भाजपच्या नेत्यांचे दारू निर्मितीचे कारखाने आहेत, भाजपच्या नेत्यांचे वाईन शॉप आहेत. भाजपच्या काही केंद्रीय मंत्र्यांच्या बार आहेत. काही माजी मंत्र्यांचे बार्स आहेत, असंही नवाब मलिक म्हणालेत.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. भाजपचा दारूला इतका विरोध असेल तर भाजपवाल्यांनी त्यांचे सगळे दारूचे परवाने सरेंडर केले पाहिजेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी दारू पिणार नाही ही शपथ घेतली पाहिजे. त्यांचे काही खासदार सांगतायत थोडी थोडी पिया करो, सर्वाधिक जास्त पिणारी मंडळी ही भाजपमध्येच आहेत. तसेच मध्य प्रदेश हे मध्य प्रदेश राहिलेलं नाही, ते मद्य प्रदेश झालंय. तिथे तर होम बारची परवानगी देण्यात आलीय. सर्वात कमी दारूची दुकानं कुठल्या राज्यात असतील तर तो महाराष्ट्र आहे, भाजप शासित प्रदेशामध्ये दारूच्या बाबतीत धोरणं आहेत, त्याबद्दल राज्यातील भाजप नेत्यांनी शेजारील राज्यातील मामांजींना भेटलं पाहिजे, असा टोलाही नवाब मलिकांनी लगावलाय.
न्यायालयीन कामात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही
खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी ज्या काही न्यायालयीन शक्यता होत्या, त्या पडताळून पाहिल्या. शेवटी न्यायालयाच्या आदेशानं त्यांना अटक झालेली आहे. न्यायालय सरकारच्या दडपशाहीनं चालतंय हे जे काही बोलतायत ते योग्य नाही. न्यायालयीन कामात कुठल्याही सरकारचा हस्तक्षेप असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी ज्या काही शक्यता होत्या, त्या आजमावून घेतलेल्या आहेत. शेवटी हा निर्णय न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयाच्या निर्णयाचं सर्वांनी सन्मान केला पाहिजे, असंही नवाब मलिकांनी सांगितलंय.
अँटेलिया बॉम्ब कांड का रचण्यात आला हे एनआयएनं सांगावं
ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांची जमानत होऊ नये, यासाठी एक वातावरण निर्मितीचं काम एजन्सी करत आहेत. अँटेलिया बॉम्ब कांड का रचण्यात आला हे एनआयएनं सांगावं. त्यांनी कितीही कटकारस्थान केलं, सरकारला बदनाम करण्याचं काम केलं. अॅडिशनल चार्जशीट केव्हा दाखल होणार आहे, परमबीर सिंहांच्या इमारतीत काय बैठक झाली होती. शर्माजी कोणासाठी काम करत होते ही सर्व माहिती लपवली जातेय. राजकीय षडयंत्रांतर्गत हे प्रकरण रचलं गेलंय. आज नाही, तर उद्या सर्वच सत्य जनतेसमोर येईल, असंही नवाब मलिकांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचाः Santosh Parab Attack Case: नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी