अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ घरी येऊन पाणी भरा अशीही मागणी करतील असा टोला लगावला. यावरुन आता हे प्रकरण थांबायचं नाव घेत नाही आहे. चंद्रकांत पाटील शनिवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
हसन मुश्रीफ यांनी माफी मागा असं म्हटलं होतं. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी लगावला. “मागणी काय…ते त्यांच्या घरी पाणी भरा अशीही मागणी करतील. लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे ना!” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
तर हसन मुश्रीफांना मलाच विकावं लागेल
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांविषयी काही गंभीर आरोप केले होते. यावरुन हसन मुश्रीफ यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही, असं आव्हान दिलं. तसंच हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील. माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर १०० कोटी काय १ कोटीही मिळणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
शरद पवांरानी आरक्षणावर लक्ष द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या विषयावर बोललं पाहिजे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी सरकारने चांगले निवृत्त न्यायमूर्ती नेमावेत. गायकवाड आयोगाने ज्या निष्ठेनं काम केलं, तसंच काम आताही झालं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.