शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत आणि राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, अशी स्पष्टोक्ती देत चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही. तथापि, अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, असे आपण यापूर्वी सातत्याने म्हणत होतो, याची त्यांनी पत्रकारांना आठवण करून दिली.
भाजपाकडे कोणीही सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव सादर केलेला नाही. भाजपाच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेते, असं पाटील म्हणाले.
शिवसेनेच्या दोनतृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच ते शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते मत व्यक्त करत असतात.
राज्यात सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरु असल्याबद्दल काही माहिती नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत जाणे नियोजित आहे. दिल्लीत अनेक कार्यकर्त्यांची अनेक कामं असतात. बऱ्याच विषयांवर केंद्रीय नेत्यांशी चर्चा करायची असते. राज्यात सुरु असलेल्या या घटनांशी भाजपचा काहीही संबंध नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा : कोट्यवधींचा बंगला, लाखो रुपयांच्या गाड्या; तरी एकनाथ शिंदेंवर आहे कर्जाचा डोंगर