महाराष्ट्रासह देशात आणि जगातच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदरपूर्वक आणि श्रद्धेने घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी केली जाते. तर ६ जून रोजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस साजरा केला जातो. यंदा महाराजांची ३९३ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० साली झाला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं कर्तृत्व आणि कसब याचा वापर करुन पुढे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. इतिहासामध्ये अनेक राजे, महाराज झाले. ज्यांनी जनतेसाठी काम केले. त्यांना आजही लोकं स्मरणात ठेवतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराज एक महान राजे होऊन गेले. ज्यांनी समता, बंधुता आणि न्याय या मुल्यांच्या आधारावर स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कोणताही भेदभाव न करता लोककल्याणाची काम केली. परंतु आजही छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचे की मुस्लिमांचे होते? अशी चर्चा होतेच.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे त्यांना फक्त हिंदू शासक म्हणून पाहणं चुकीचं ठरु शकते. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला लढा हा केवळ हिंदूंसाठी होता. यामुळे मुस्लिमांवर अन्याय झाला, असे मानणारे काही जण आहेत. पण त्यांची संख्या खूपच अल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक होते. तसेच ते हिंदू मुस्लिम आणि इतर धर्मांचाही आदर करायचे. याची प्रचिती आपल्याला इतिहासातील अनेक घटनांमधून दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यात सहभागी असलेल्या मराठ्यांना मावळे असं संबोधले जाते. या मावळ्यांमध्ये हिंदू, मुस्लिम इतर धर्मांचे मावळेसुद्धा महाराजांच्या सैन्यात सहभागी होते. सातारा, कोल्हापूरमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरे करतात. महाराजांचा आपल्या मुस्लिम सैनिकांवरसुद्धा अतूट विश्वास होता. एकून ६० हजारांपेक्षा जास्त मुस्लिमांचा मावळ्यांमध्ये सहभाग होता. सागरी किल्ल्यांचे व्यवस्थापन बाग दोर दर्या सारंग, दौलत खान, इब्राहिम खान सिद्दी मिस्त्री यांसारख्या अनुभवी मुस्लिम गव्हर्नरांकडे सोपवण्यात आले होते. शिवाजी महाराजांचे औदार्य आणि कार्यशैली पाहून अनेक मुस्लिम सरदार महाराजांना भेटायला आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एका सरदाराकडे 500 ते 700 सैनिकांची जबाबदारी होती. महाराजांच्या सैन्यात १२३ मुस्लिम सरदार होते आणि प्रत्येक सरदारावर महाराजांचा विश्वास होता. या सरदारांनी पण स्वराज्य स्थापन्यासाठी जीवाची पर्वा केली नाही. परंतु या सरदारांचा इतिहास मात्र प्रकाशझोतात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखानच्या संघर्षाची चर्चा करुन हिंदू-मुस्लिम असा रंग दिला जातो. प्रतापगडावर अफझलखानाचा वध केल्यानंर महाराजांनी मृतदेह इस्लामी रितीरिवाजांनुसार आदरपूर्वक दफन करण्याचे आदेश दिले. याचे अवशेष आपण प्रतापगडावर पाहिले आहेत. त्या ठिकाणी कबर बनवण्यात आली तसेच खानाच्या मुलाला माफी दिली. महाराजांनी कधीही महिलांवर अन्याय केला नाही. महाराजांनी मुघलांशीसुद्धा वैचारिक आणि राजकीय हेतूने युद्ध केली पण कधीही धार्मिक विचाराने युद्ध केलं नाही. यामुळे महाराज हे केवळ हिंदूंचे नाही तर मुस्लिमांचेसुद्धा आहेत.