राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाच्या राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावं, अशा प्रकारची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी सेवा ठप्प आहेत. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. दरम्यान, मविआ सरकार वाया गेलेल्या मुलांसारखं वागतयं, ७० वर्षाच्या म्हाताऱ्या आईला आपल्या ST ला ‘वृद्धाश्रमात’ पाठवलं जातंय, अशा प्रकारची ट्विट करत भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ट्विटच्या माध्यमातून काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
अजूनही ‘वाट पाहिन पण एसटीने जाईन’एवढा प्रवाशांचा ST वर विश्वास आहे. सोन्याची अंडी उबवणा-यांना ST-जनतेची नाळ कशी कळणार. मविआ सरकार वाया गेलेल्या मुलांसारखं वागतंय. ७० वर्षाच्या म्हाताऱ्या आईला आपल्या ST ला ‘वृद्धाश्रमात’ पाठवलं जात आहे. अनिल परब यांना टॅग करत आईचं चांगलं पांग फेडतायं, असं म्हणत चित्रा वाघ यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजूनही ‘वाट पाहिन पण एसटीने जाईन’एवढा प्रवाशांचा ST वर विश्वास आहे..
सोन्याची अंडी उबवणा-यांना ST-जनतेची नाळ कशी कळणार..#MVA सरकार वाया गेलेल्या मुलांसारखं वागतंय..
७० वर्षाच्या म्हाता-या आईला आपल्या ST ला ‘वृद्धाश्रमात’ पाठवलं जातंय..@advanilparab आईचं चांगलं पांग फेडतायं…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 11, 2021
एसटी महामंडळाकडून उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल
दरम्यान, एसटी कामगार संघटना आणि संपकरी कामगारांनी न्यायालयाचा आदेश झुगारल्यामुळे एसटी महामंडळाने उच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. परंतु या सुनावणीमध्ये येत्या शुक्रवार पर्यंत उच्च न्यायालयाने प्रतिवादींना प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा: नोटीस वॉर…अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस
कर्मचाऱ्यांनी आगारातच मुक्काम ठोकला
काही एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा संप अधिक प्रमाणात तीव्र झाला आहे. कर्मचाऱ्यांनी आगारातच मुक्काम ठोकला आहे. कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस आगारातच राहण्यासाठी कपडे आणि पाण्याची सोय केली आहे. काल बुधवारी नांदगाव, मालेगाव आणि पेठ या आगारांमधून तब्बल ३० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महामंडळाच्या कारवाईला कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवत निलंबनाच्या नोटीसा अद्यापही स्वीकारल्या नाहीयेत. परिणामी, मंहामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आगाराच्या बोर्डावरच नोटिसा चिकटवल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून राज ठाकरे यांची भेट
एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांनी आज (गुरूवार) मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. तसेच या आंदोलनाला १४ दिवस पूर्ण झाले आहेत. आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू होण्याचे निर्देश दिलेले असताना, दुसरीकडे राज्य सरकारकडून ९१८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याचदरम्यान कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करू नका, असं आवाहन केलं आहे.