नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. जातपडताळणी समितीकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जातपडताळणी समितीने हा निर्णय घेतल्यानंतर आता काँग्रेसकडून नेमका कोणता निर्णय घेण्यात येतो, यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण या निर्णयानंतर रश्मी बर्वे यांच्याकडून अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. (Congress Lok Sabha candidate Rashmi Barve caste verification certificate cancelled)
हेही वाचा… Maha Politics : अमरावतीचे राजकारण तापले, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ बंडाच्या तयारीत
काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर अवैध ठरविण्यात आल्याने याचा मोठा फटका काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला बसणार असल्याचे बोलले जात आहे. जात वैधता प्रमाणपत्रावर घेतलेल्या आक्षेपवर बर्वे यांनी कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता जातपडताळणी समितीनेच घेतलेल्या निर्णयामुळे पुढे काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत आता रश्मी बर्वे यांच्यासह काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीचा मुद्दा हा सर्वाधिक चर्चेत आहे. कारण बर्वेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा समोर आला आहे. त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही, असा दावा करण्यात आला होता. बर्वे यांच्या जातप्रमाणपत्राबाबत सुनिल साळवे नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाने जात पडताळणी समितीला योग्य ती कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार मिळाल्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या आदेशानुसार त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. याच नोटिशीला बर्वे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. केवळी राजकीय सुडभावनेतून माझ्यावर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत, असा दावा रश्मी बर्वे यांनी आपल्या याचिकेत केला होता. त्यानंतर आता जातपडताळणी समितीनेच हा निर्णय दिल्याने रश्मी बर्वे मोठ्या संकटात सापडलेल्या आहेत.