घरमहाराष्ट्रअल्पबचत योजनांच्या व्याजदराचा मुद्दा, काँग्रेस- NCP कडून केंद्र सरकारवर हल्लाबोल

अल्पबचत योजनांच्या व्याजदराचा मुद्दा, काँग्रेस- NCP कडून केंद्र सरकारवर हल्लाबोल

Subscribe

केंद्रसरकारने यापूर्वीचे निर्णयदेखील नजरचुकीने घेतले असावेत, जयंत पाटील यांचा खोचक निशाणा

बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय हा नजरचुकीने झाला होता म्हणून तो मागे घेत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले आहे. परंतु देशभरातून मोदी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता तसेच पाच राज्यातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणूनही तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली असली तरी सात वर्षापासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवण्याची केलेली ‘घोडचूक’ मोदी सरकार कधी सुधारणार? अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कोणताही दिलासा देणारा निर्णय घेतला गेलेला नाही. प्रत्येक निर्णय हा चुकीच्या पद्धतीने घेऊन जनतेला वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. नोटबंदी, जीएसटी, नियोजन न करता लावलेले लॉकडाऊन या मोदी सरकारच्या चुकांमुळे देश अधोगतीकडे गेला. छोटे, लहान, मध्यम उद्योगांची स्थिती अत्यंत अवघड झाली आहे. मनमानी व लहरी निर्णयामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कोरोनामुळे त्यात आणखी भर पडून इतर क्षेत्रालाही अस्तित्व टिकवण्याची धडपड करावी लागत आहे. त्यात भविष्यासाठी केलेल्या बचतीच्या तरतुदीवरही मोदी सरकारची वक्रदृष्टी पडली.

- Advertisement -

बचतीवरील व्याजदर कमी करून पुन्हा सामान्य जनतेचे कंबरडे मोडले. या निर्णयावर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यातच पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकांमध्ये फटका बसू नये म्हणून नजरचुकीच्या नावाखाली निर्णय तूर्तास मागे घेतला असला तरी मोदी सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता निवडणुकांनंतर पुन्हा हा निर्णय घेतला जाणार नाही असे ठामपणे सांगता येणार नाही.

मागील ७ वर्षांपासूनची घोडचूक कधी सुधारणार

बचतीवरील व्याजदर कपातीचा निर्णय नजरचुकीने झाल्याचे मोदी सरकार म्हणत असेल तर मागील सात वर्षापासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढवण्याची जी घोडचूक केली जात आहे ती कधी सुधारणार. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर आजच्यापेक्षा दुप्पट असतानाही इंधनाचे दर स्थिर ठेवून जनतेला महागाईच्या झळा पोहचू दिल्या नाहीत परंतु मोदी सरकारला मात्र अशापद्धतीने जनतेला दिलासा देता आलेला नाही. हे सरकार सामान्य जनतेच्या हितापेक्षा मुठभर उद्योगपतींच्या हिताची जपणूक करणारे आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून अदानीच्या फॉर्च्युनसह इतर कंपन्यांनी खाद्यतेलाच्या किंमती प्रचंड वाढवून सर्वसामान्य जनतेची लूट सुरु केली आहे ती कधी थांबवणार? असा प्रश्नही पटोले यांनी विचारला आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना मोदी सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लुट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लिटर आहे.

पण मोदी सरकारने डिझेलवर ८२० टक्के तर पेट्रोलवर २५८ टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर १०० रुपये लिटर तर डिझेलचे दर ९० रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. एलपीसी सिलिंडर सुद्धा ८५० रुपयांच्यावर गेले आहे. ही घोडचूक सुधारून सामान्य जनतेला मोदी सरकार दिलासा देईल का?, असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

ही तर कोट्यवधी ठेवीदारांची थट्टा – जयंत पाटील

भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णय देखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारने विविध अल्पबचत योजनांवरील व्याजाच्या दरात कपात केली. त्यानंतर लगेचच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही कपात मागे घेत यु-टर्न घेऊन सारवासारव केली आहे. यावर जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याज वार्षिक ४ वरून ३.५ टक्के केले आहे. एक वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ५.५ वरून ४.४ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज ७.४ वरून ६.५ टक्के केले आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ वरून ५.९ टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के करण्यात आले. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी केले आहेत. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (१ एप्रिल ते ३० जून २०२१) हे नवे व्याजदर लागू राहतील. मात्र नजरचुकीने झाले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. दरम्यान भाजपचे सरकार प्रत्येकवेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्रसरकारने थट्टा केली आहे असा थेट आरोपही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -