इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहलीचे गुरुवारी (आज) चेन्नईमध्ये आगमन झाले. आता त्याला सात दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असून त्यानंतर तो आरसीबीच्या संघात दाखल होईल. यंदा आयपीएलच्या सलामीच्या लढतीत आरसीबीचा संघ खेळणार आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये ९ एप्रिलला होणाऱ्या आयपीएलच्या सलामीच्या लढतीत आरसीबीसमोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे (MI) आव्हान असणार आहे.
If you thought we were done breaking the internet for the day, think again! 😎
Captain Virat Kohli 👑 has arrived in Chennai 🤩#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/p1BS81eChE
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) April 1, 2021
आरसीबीने ट्विट करत दिली माहिती
आयपीएल स्पर्धेला २००८ पासून सुरुवात झाली आणि अगदी पहिल्या मोसमपासून कोहली आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहे. नुकतीच भारत आणि इंग्लंड यांच्यात पुणे येथे एकदिवसीय मालिका पार पडली. ही मालिका संपल्यावर कोहली सोमवारी घरी परतला होता. आता तो आयपीएल स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. ‘कर्णधार विराट कोहलीचे चेन्नईत आगमन झाले,’ असे ट्विट आरसीबीने गुरुवारी केले.
जेतेपदासाठी प्रबळ दावेदार
आरसीबीला यंदा आयपीएलचे जेतेपद पटकावण्याची प्रबळ दावेदार मानले जात आहे. कोहलीसोबतच या संघात एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच त्यांनी या मोसमाआधी झालेल्या खेळाडू लिलावात ग्लेन मॅक्सवेल आणि कायेल जेमिसन यांना मोठ्या रकमेत खरेदी केले. त्यामुळे आरसीबीचा संघ यंदा कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.