कोरोना महामारीच्या लढाईला हरवण्यासाठी राज्यात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात १० कोटींचा लसीकरणाचा टप्पा पार झाला होता. आता राज्यात ११ कोटींचा लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. यामधील ४ कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, म्हणजेच या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याबाबतची माहिती डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. भारतात लसीकरण मोहिमेत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर असून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले की, मला हे सांगताना आनंद होत आहे की, जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक आणि कठोर परिश्रमाने राज्यातील ४ कोटींहून अधिक व्यक्तींचे पूर्णतः लसीकरण करण्यात आले आहे. काल संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत ११.३२ लाखांपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत राज्याने ११.३२ कोटी लसीचे डोस दिले असून ७ कोटी ४२ लाख ८७ हजार ८१८ व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
दरम्यान कोविन डॅशबोर्डवर दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत १२३ कोटी १६ लाख ८८ हजार ४६७ लसीकरण झाले आहेत. यापैकी ४५ कोटी ८ लाख ५५ हजार ७२९ जणांची लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर ७९ लाख ६ हजार ३२ हजर ७३८ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. देशातील लसीकरण मोहिमेत आघाडीवर असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये १६ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण झाले आहे. तर महाराष्ट्रात ११ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण पार पडले आहे.
हेही वाचा – ओमायक्रॉनमुळे मुंबईतील शाळा 15 डिसेंबरला उघडणार