मंत्रिमंडळ विस्तार आता होणार होता, पण राष्ट्रपती निवडणूक मध्ये आली, असे वक्तव्य आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा १८ तारखेनंतर होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे गटातील अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार केला तर शिंदे गटातील आमदार नाराज होऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. (Deepak Kesarkar on cabinet expansion)
हेही वाचा – उद्धव ठाकरेंना पवारसाहेब लाडके, शिवसैनिक परके; दीपक केसरकरांची टीका
जो मनाचा मोठेपणा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांकडे होता तो उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील आहे. त्यांनी अजूनही तो दाखवावा आणि आम्हाला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे केले. या संघर्षाचा शेवट गोड होणार होणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना केसरकर यांनी शरद पवार हवेत की आपले शिवसैनिक हवे आहेत याचाही निर्णय घ्या, अशी साद घातली.
आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी केसरकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती. पण उद्धव ठाकरे यांनी साथ सोडली नाही. शेवटपर्यंत शरद पवार त्यांना राजीनामा देऊ नका असे सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत.
हेही वाचा – मातोश्रीवर खासदारांची बैठक का झाली? संजय राऊतांनी सांगितलं कारण, म्हणाले राष्ट्रपती…
आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आम्हालाच नाहीतर सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही. अध्यक्षांची निवड झाली आहे. आतापर्यंत बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. अविश्वास ठराव असो वा अपात्रतेचा विषय हे विषय आता निकाली निघाले आहेत. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन दूर करण्यासंबंधी सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. ती आता जवळपास निकालात लागली आहे. सेनेच्या याचिकेतल्या मुद्द्यांनाही आता अर्थ नाही, असे केसरकर यांनी सांगितले.
विधानसभेला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते. आता अध्यक्षांची निवड झाली असून सर्वांना त्यांचे आदेश मानावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नाही. आमच्या मित्रपक्षाने देखील त्यांच्यावर भाष्य करू नये असेही त्यांनी भाजपला सुनावले.