घरमहाराष्ट्रशिंदे, फडणवीस सरकार बरखास्त करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

शिंदे, फडणवीस सरकार बरखास्त करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

Subscribe

राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यासमोरील संकटाकडे आणि जनतेला भेडसावणा-या ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप पूर्णपणे वाया गेले आहे

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे ईडी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून केली.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसह राज्यातील बेरोजगारी, राज्यातील प्रकल्प गुजरातला जाणे तसेच दिवाळीच्या तोंडावर घोषित केलेल्या आनंद शिधा योजनेत होत असलेला भ्रष्टाचाराचा आरोप या मुद्द्यांवर काँग्रेसच्या नेत्यांनी आज राजभवनात जाऊन कोश्यारी यांना निवेदन दिले.

- Advertisement -

राज्यपालांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यासमोरील संकटाकडे आणि जनतेला भेडसावणा-या ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मका, उडीद ही सर्वच पीके शेतक-यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने वाढवली. त्याला खते आणि कीटकनाशके यासाठी मोठा खर्चही केला होता. मात्र, पिके हातात येण्याच्या आधीच वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतक-याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-याला मदतीचे पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. पण अद्याप सरकारने ओला दुष्काळही जाहीर केला नाही आणि शेतक-यांना मदतही दिली नाही.

एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारचे दुर्लक्ष अशा दुहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला आहे. ईडी सरकार शेतक-यांसाठी काहीच करत नाही. त्यामुळे शेतक-यांचा सरकारवर विश्वास राहिला नसून नैराश्यापोटी ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. राज्यात दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे. ऐन दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यातील एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली, ही राज्याला लाज आणणारी बाब आहे, असे पटोले म्हणाले.

- Advertisement -

गेल्या तीन महिन्यात दीड लाख कोटी रुपयांचा वेदांता फॉक्सकॉन, ३ हजार कोटींचा बल्क ड्रग पार्क आणि २२ हजार कोटींचा टाटा एअरबस असे तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून राज्यातील बेरोजगारांना मिळणारे रोजगारही हिरावले गेले आहेत. आपल्या देशातील बेरोजगारी गेल्या ४५ वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. लाखो पदे रिक्त असतानाही सरकार नोकरभरती करत नाही. राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जात आहेत.  त्यामुळे राज्यातील तरुण हताश आणि निराश झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारे शिधा वाटप करण्यात मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो, त्यामुळे थेट नागरिकांच्या खात्यात रोख रक्कम ३ हजार रुपये द्यावी अशी मागणी केली होती. पण सरकारने शिधा वाटपाचा निर्णय घेतला. दिवाळी संपून गेली तरी अद्याप लोकांना आनंदाचा शिधा मिळाला नाही. काहींना शिधा मिळाला पण त्यात कुठे साखर नव्हती, कुठे तेल नव्हते तर कुठे रवा नव्हता. जे साहित्य दिले ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. या शिधा वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असून लोकांची दिवाळी कडू करण्याचेच काम राज्य सरकारने केले आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

उद्योग पळवले जात असताना शिंदे-फडणवीस सरकार झोपा काढत होते का?

महाराष्ट्र राज्य गुंतवणूकदारांसाठी पहिल्या पसंतीचे राज्य आहे. मागील ६० वर्षात काँग्रेस सरकारच्या काळात मोठ मोठे उद्योग उभे राहिले. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या म्हणून महाराष्ट्र देशात प्रगत राज्य म्हणून नाव लौकिक मिळालेला आहे. परंतु केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकारने असताना महाराष्ट्रात होत असलेली गुंतवणूक गुजरातमध्ये जात होती, तेव्हा शिंदे- फडणवीस सरकार काय झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला. राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात काँग्रेस विधिमंडळ  पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार सुरेश वरपुडकर, संग्राम थोपटे, संजय जगताप, राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी आदींचा समावेश होता.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -