घरताज्या घडामोडीशिवाजी महारांजावरील संरक्षण मंत्र्यांचे 'ते' विधान चुकीच्या एकीव माहितीवर, खासदार अमोल कोल्हेंचा...

शिवाजी महारांजावरील संरक्षण मंत्र्यांचे ‘ते’ विधान चुकीच्या एकीव माहितीवर, खासदार अमोल कोल्हेंचा संताप

Subscribe

राजमाता जिजाबाई, समर्थ रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळातून शिक्षण दिल्यानेच शिवाजी महाराज छत्रपती म्हणून घडतानाच, राष्ट्रनायक झाले. आपण महाराष्ट्रातच आहोत, ज्याठिकाणी एका खेळाने एका मुलाला राष्ट्रनायक म्हणून घडवले, असे वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात फक्त राजमाता जिजाऊ यांचेच योगदान आहे. त्यांच्या घडवणुकीत समर्थ रामदास किंवा दादोजी कोंडदेव यांचा सहभाग नाही, असा दावा संघटनांचा आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा या वादाची ठिणगी पडली आहे. या वक्तव्यावर आता आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या विषयावर आपले मत मांडले आहे. केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या धक्कादायक विधानाचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निषेध केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते.”, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisement -

केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चुकीच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर आपला जाज्वल्य इतिहास हा निःपक्षपातीपणाने, तर्कसंगत पद्धतीने, अकारण कुणाचेही स्तोम माजवून एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न टाळून राज्य, देश आणि जगभरात सांगण्याची गरज आहे. दोन दिवसांपूर्वीच एका हिंदी दिग्दर्शकाने मुघल शासक हे राष्ट्रनिर्माते आहेत, असे सांगितले. त्यामुळे हा इतिहास सांगण्याची गरज आणखी प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ निषेध किंवा एखादे आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. मला वाटते ही वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे. साहित्य, कला याचा समाजमनावर दीर्घकालीन परिणाम होतो, त्या माध्यमातून आपण निःपक्षपाती, तर्कसंगत इतिहास जगभर पोहोचवला पाहिजे, असेही खासदार डॉ. कोल्हे म्हणाले.

छत्रपतींच्या मुद्द्यावर बोलताना माहिती घेण्याची गरज होती, असे मत आता संघटनांकडूनही व्यक्त करण्यात येत आहे. यासारख्या संवेदनशील विषयावर बोलताना आणि तेदेखील पुण्यात बोलताना संरक्षण मंत्र्यांनी या विषयाबाबतची माहिती घेऊन बोलायले हवे होते अशीही मागणी आता संघटनांकडून होऊ लागली आहे. राजनाथ सिंह यांचे उदाहरण त्याप्रसंगी योग्य होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी घडवले याबाबतची माहिती ही चुकीची दिल्यानेच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.


हे ही वाचा – नारायण राणेंनी अतिशहाणपणा केल्यानेच लगाम घालणे गरजेचे होते – संजय राऊत


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -