लातूर जिल्ह्यतल्या एकुरगा गावात पुन्हा एकदा आगीची दुर्घटना घडली आहे. २३ डिसेंबर रोजी याच गावात अश्याच प्रकारची आग लागली होती. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लागलेल्या आगीमुळे गावकरी चिंतेत पडले आहेत. बाळासाहेब इंगळे पाटील यांची गावशेजारीच शेती आहे. जिथे सकाळच्या सुमारास ही भयंकर आग लागली.
लातूर जिल्ह्यातल्या एकुरगा गावात १५ दिवसांत दोनदा आग लागली. मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून पैशांची मागणी… पैशाच्या मागणीची ऑडिओ क्लिप व्हायरल | #MyMahanagar pic.twitter.com/UxHdPq6mxZ
— My Mahanagar (@mymahanagar) January 6, 2019
आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता ते शक्य नसल्याने अजय अडसूळ या तरुणाने जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या अग्निशमन दलाला संपर्क केला असता पलीकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पलीकडून बोलणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने गाडी बाहेर पडताच आम्हाला बिल द्यावे लागते असे सांगत पैशाची मागणी केली.
या घटनेमुळे एकुरगा गावातल्या लोकांनी संताप व्यक्त केला आहे. १५ दिवसात झालेल्या या दुसऱ्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.