राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे राज्यात ग्रामसमृद्धी योजना लागू होणार असून मनरेगा आणि राज्य योजनेच्या एकत्रिकारणातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजना’ सुरू करण्यात येणार आहे. शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी असतो. याच ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकार मोठी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच, या वाढदिवसाची भेट म्हणून महाविकास आघाडीकडून ही योजना राबवण्यात येणार आहे. तर शरद पवार यांच्या ग्रामविकासातील योगदानाची अनोखी दखल राज्य सरकारने घेतली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. मनरेगाच्या धर्तीवर राज्यात ग्रामसमृद्धी योजना योजना लागू असेल. ही गावांसाठी आणि गावातील प्रत्येकासाठी योजना असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, शरद पवारांच्या वाढदिवसापूर्वीच महाविकास आघाडीकडून ही भेट देण्याचे ठरवले आहे. तर केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ही नवी योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, रोजगार हमी विभाग हा प्रस्तावित शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल विभाग असेल. राज्य सरकारने असा दावा केला आहे की, ही योजना लागू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून येतील. त्याचबरोबर या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोक सशक्त बनतील. ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करणे देखील या योजनेचा उद्देश आहे.
१ लाख किमी रस्त्यांची निर्मिती या योजनेंतर्गत केली जाईल. शेतीपट्ट्यांना हे रस्ते जोडले जातील. यामुळे शेतीपर्यंत जाणे सोयीचे होईल आणि रोजगारही उपलब्ध होईल. त्याचबरोबर तलाव आणि तबेल्यांची या योजनेंर्गत निर्मिती करण्यात येईल. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेवर पुढील तीन वर्षात १,००,००० कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. मनरेगा योजनेंतर्गत नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात सुमारे ६.४६ लाख कामे होती. यांपैकी ४.७७ काम पूर्ण होण्याच्या दिशेने पुढे जात आहेत. आजवर या योजनेंतर्गत १.६८ लाख काम पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रात मनरेगा योजनेंतर्गत ६.१० लाखांहून अधिक मजूर नोंदणीकृत झाले आहेत.